एकदा तथागत बुद्ध श्रमण भिक्खुंसोबत रस्त्याने जात असताना एक सुगंधीत वेष्टन जमिनीवर पडलेले त्यांना दिसले. थोडे दूर चालून गेल्यावर पुढे त्यांना मृत माशाचा तुकडा पडलेला दिसला. या दोन्ही वस्तूंकडे तथागतांनी भिक्खूंचे लक्ष वेधले. सुगंधी पदार्थाला स्पर्श झालेल्या वेष्टनाचा सुगंध आणि मृत माशाच्या तुकड्याचा दुर्गंध या दोन गोष्टीतून आपल्याला काय सत्य शिकायला मिळाले हा विचार ते भिक्खू करत असतानाच तथागत भगवान बुद्ध पुढील गाथा ऐकवतात:
- १. जो क्षुद्र मनोवृत्तीच्या किंवा नीच प्रवृत्तीच्या माणसाची संगत करतो; त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधीत होणाऱ्या माणसासारखी होते. तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो.
- २. परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधीत होतो; त्याप्रमाणे सज्जनांची संगत धरणारा शहाणा मनुष्यही अधिक प्रगत होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो. त्याला या गुणांत पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो.
संदर्भ:
बुद्ध आणि त्यांचा धम्म - लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
द्वितीय खंड, भाग पाचवा
No comments:
Post a Comment