4.बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- अष्टांग मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग



🌷4.बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- अष्टांग मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग🌷

The Buddha's First Sermon- Ashtanga Marga or The Path of Righteousness
*************************

1) नंतर बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांग मार्गाविषयी प्रवचन दिले. बुद्धांनी सांगितले की अष्टांग मार्गाचे आठ घटक आहेत.
(सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती)

2) अष्टांग मार्गाचे पहिले व सर्वात महत्वाचे अंग 'सम्मा दिट्ठी' (सम्यक दृष्टी) Right View. याच्या स्पष्टीकरणाने बुद्धांनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली.

3) "सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरिता," बुद्ध परिव्राजकांना म्हणाले:

4) "परिव्राजकहो, जग ही एक अंधारकोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे."

5) "ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही."

6) "खरोखर, दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे; इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते."

7) "मन हे एक असे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो."

8) "तथापि, या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल."

9) "त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते."

10) "अशा प्रकारे त्यांची आकलनशक्ती स्वभावतःच सदोष असते."

11) "परंतु परिव्राजकहो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या."

12) "कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते."

13) "कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशाप्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल की, शेवटी त्याची गतिमान इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त व स्वतंत्र करील."

14) "अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील."

15) "आपणाला पाहिजे त्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण आहे (This is because it is possible to train the mind in whatever directions one chooses). मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते."

16) "पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करु शकते."

17) "सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय."

18) "सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे?", परिव्राजकांनी विचारले. बुद्धांनी उत्तर दिले, "अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे."

19) "मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख दूर करण्याचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय." 
20) "सम्यक दृष्टीकरिता माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे आवश्यक आहे."  

21) "सम्यक दृष्टीकरिता माणसाने अंधश्रद्धा व अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. (निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये)"

22) "ज्या सिद्धांताना (doctrines) वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत."

23) "स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत."

24) "प्रत्येक माणसाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात (aims, aspirations and ambitions). अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी (noble and praiseworthy). ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी. हा 'सम्यक संकल्पा' चा आशय आहे."

25) "सम्यक वाचा (Right Speech) पुढील शिकवण देते:
i) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे
ii) असत्य बोलू नये
iii) माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये
iv) माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे
v) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरु नये
vi) माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे
vii) माणसाने अर्थहीन, मूर्खपणाची बडबड करु नये. त्याचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे."

26) "मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये (not to be the result of fear or favour). सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता कामा नये."

27) "वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही."

28) "सम्यक कर्मान्त" (Right Action) हे योग्य वर्तनाची (behaviour) शिकवण देते. दुसऱ्याच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे."

29) "सम्यक कर्मान्ताचे प्रमाण कोणते? जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय."

30) "एखाद्याची वागणूक ज्या वेळी या नियमांशी सुसंगत असते त्या वेळी ती सम्यक कर्मान्ताला अनुसरून आहे असे समजावे."

31) "प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो. परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसऱ्याची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता उपजिविका करण्याचे जे मार्ग ते चांगले होत. याला "सम्यक आजीविका" (Right Livelihood) म्हणतात."

32) "सम्यक व्यायाम" (Right Endeavour) म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न करणे होय. अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय."

33) "सम्यक व्यायामाचे चार हेतू असतात:"

34) "अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तींना प्रतिबंध करणे हा एक हेतू होय."

35) "अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्यांचे दमन करणे हा दुसरा हेतू होय."

36) "अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती (states of mind) उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय."

37) "अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांंची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय."

38) ""सम्यक स्मृतीला" जागरुकपणा व विचारीपणा (mindfulness and thoughtfulness) यांची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय."

39) "परिव्राजकहो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गात पाच अडथळे किंवा बंधने असतात."

40) "लोभ, द्वेष, आळस व सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे पाच अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजेच बंधने होत. आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी होय. परंतु हे परिव्राजकहो, 'समाधी' म्हणजेच 'सम्यक समाधी' नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरुप अगदी निराळे आहे."

41) "समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही."

42) "परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरुपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कायम स्वरुपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल."

43) "समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरताच अटकाव होतो. म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही सकारात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा (Good Deeds and Thoughts) विचार करण्याचे शिक्षण देते. आणि त्याला अनुसरुनच अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे (Bad Deeds and Bad Thoughts) आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्ती ती नष्ट करते."

44) "सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व नेहमीच चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते."

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************
बुद्ध आणि त्यांचा धम्म 
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
द्वितीय खंड-भाग दुसरा
*****************************
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************
पुढील भागात:
५. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- शीलमार्ग

No comments:

Post a Comment