2. बुद्धांचे पहिले प्रवचन- मध्यम मार्ग



🌷2. बुद्धांचे पहिले प्रवचन 🌷

The Buddha's First Sermon
*************************
1) परस्परांना अभिवादन करुन कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्राजकांनी बुद्धांना विचारले, "तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय?" बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले.

2) बुद्ध म्हणाले, "जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे (a life of pleasure) व दुसरे आत्मक्लेशाचे (a life of self-mortification).

3) "एक म्हणतो, खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो, सर्व वासना (desires) मारुन टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत." हे दोन्हीही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे; म्हणून बुद्धांनी ते नाकारले.

4) बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. 'मज्जिम पतिपद' - 'मधला मार्ग' जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही.

5) बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, "माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व, मीपणा कार्यप्रवृत्त असतो आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय?" ते उत्तरले, "आपण म्हणता ते बरोबर आहे."

6) "जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करु शकत नाही; तर आत्मक्लेशाचे दरिद्री व निरुपयोगी जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल?" त्यांनी उत्तर दिले, "आपण म्हणता ते बरोबर आहे."

7) "जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल; तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्ही ऐहिक सुखोपभोगाची इच्छा धरणार नाही आणि नैसर्गिक गरजांची तृप्ती झाल्यामुळे तुमच्यात मलीन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारिरीक गरजेनुसार तुम्ही खा, प्या."

8) "सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती (pleasure-seeking) अधःपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि, माझे तुम्हाला सांगणे असे की, जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही: शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ व स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारुपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही." (To keep the body in good health is a duty, or otherwise you shall not be able to keep your mind strong and clear and have the lamp of wisdom burning.)

9) "हे परिव्राजकहो, ही गोष्ट समजून घ्यावी की, ही दोन आत्यंतिक अशी टोके (extremes) आहेत की, माणसाने त्यांचा कधीही अवलंब करु नये- एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण तृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे- तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे सतत केलेली तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे."

10) "
ही दोन्ही आत्यंतिक टोके (extremes) ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मार्गाची शिकवण देत आहे."

11) त्या पाच परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले की, "आपणाला आम्ही सोडून आल्यानंतर आपण काय काय केले?" तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यावर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला हे सर्व बुद्धांनी त्यांना सांगितले.

12) हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास परिव्राजक अधीर झाले आणि ते स्पष्ट करुन सांगण्याविषयी त्यांनी बुद्धांना विनंती केली.

13) तथागत बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली.

14) सुरुवातीलाच तथागतांनी त्यांना सांगितले की, आपला जो मार्ग, जो धम्म आहे, त्याला "ईश्वर" आणि "आत्मा" यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा "कर्मकांडाशी" काही संबंध नाही (rituals and ceremonies).

15) "माणूस" आणि "माणसाचे माणसाशी या जगातील नाते" हा तथागत बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे.

16) बुद्धांनी सांगितले की, आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. (first postulate)

17) मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यांत राहात आहे हे त्याचे दुसरे आधारतत्त्व आहे. हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. (To remove this suffering from the world is the only purpose of Dhamma.)

18) दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच तथागत बुद्धांच्या धम्माचा पाया व मूलाधार आहे.

19) हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे.

20) "खरोखरच, हे परिव्राजकहो! जगातील दुःख आणि दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे, हे ज्या श्रमणांना आणि ब्राम्हणांना (धर्मोपदेशकांना) समजत नाही ते माझ्या मते, श्रमण आणि ब्राम्हण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा खराखरा अर्थ काय आहे हे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही."

21) नंतर परिव्राजकांनी बुद्धांना विचारले, "दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा."

22) बुद्धांनी सांगितले की, या धम्मानुसार जर प्रत्येकाने खालील मार्गांचे अनुसरण केले तर त्यामुळे या दुःखाचा अंत होईल:
i) विशुद्धी मार्ग (the Path of Purity),
ii) सदाचरणाचा मार्ग (the Path of Righteousness) आणि
iii) शीलमार्ग (the Path of Virtue)


23) आणि अशा धम्माचा अविष्कार आपण केला आहे, असे तथागत पुढे म्हणाले.
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************
बुद्ध आणि त्यांचा धम्म 
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
द्वितीय खंड-भाग दुसरा
*****************************
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************




No comments:

Post a Comment