1. सारनाथ येथे आगमन




🌷1. सारनाथ येथे आगमन 🌷

Arrival at Sarnath
*************************

1) आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की, "सर्वप्रथम कुणाला धम्मोपदेश देऊ?" ("to whom shall i first teach the doctrine?") त्यांना आलारकालाम याची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. "त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर?" परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले.

2) नंतर त्यांनी उद्दक-रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला; परंतु तोही मृत्यू पावला होता.

3) त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्यांच्या बरोबर होते. आणि त्यांनी तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले होते.

4) बुद्ध स्वतःशीच म्हणाले, "त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले. माझी सेवा केली. माझी खूप काळजी घेतली. मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे?"

5) त्यांनी त्यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली, तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपत्तनच्या मृगदायवनात राहात आहेत (in the deer park of Isipatana). ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले.

2. बुद्धांचे पहिले प्रवचन- मध्यम मार्ग



🌷2. बुद्धांचे पहिले प्रवचन 🌷

The Buddha's First Sermon
*************************
1) परस्परांना अभिवादन करुन कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्राजकांनी बुद्धांना विचारले, "तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय?" बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले.

2) बुद्ध म्हणाले, "जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे (a life of pleasure) व दुसरे आत्मक्लेशाचे (a life of self-mortification).

3) "एक म्हणतो, खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो, सर्व वासना (desires) मारुन टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत." हे दोन्हीही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे; म्हणून बुद्धांनी ते नाकारले.

4) बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. 'मज्जिम पतिपद' - 'मधला मार्ग' जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही.

5) बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, "माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व, मीपणा कार्यप्रवृत्त असतो आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय?" ते उत्तरले, "आपण म्हणता ते बरोबर आहे."

6) "जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करु शकत नाही; तर आत्मक्लेशाचे दरिद्री व निरुपयोगी जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल?" त्यांनी उत्तर दिले, "आपण म्हणता ते बरोबर आहे."

7) "जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल; तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्ही ऐहिक सुखोपभोगाची इच्छा धरणार नाही आणि नैसर्गिक गरजांची तृप्ती झाल्यामुळे तुमच्यात मलीन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारिरीक गरजेनुसार तुम्ही खा, प्या."

8) "सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती (pleasure-seeking) अधःपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि, माझे तुम्हाला सांगणे असे की, जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही: शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ व स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारुपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही." (To keep the body in good health is a duty, or otherwise you shall not be able to keep your mind strong and clear and have the lamp of wisdom burning.)

9) "हे परिव्राजकहो, ही गोष्ट समजून घ्यावी की, ही दोन आत्यंतिक अशी टोके (extremes) आहेत की, माणसाने त्यांचा कधीही अवलंब करु नये- एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण तृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे- तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे सतत केलेली तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे."

10) "
ही दोन्ही आत्यंतिक टोके (extremes) ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मार्गाची शिकवण देत आहे."

11) त्या पाच परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले की, "आपणाला आम्ही सोडून आल्यानंतर आपण काय काय केले?" तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यावर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला हे सर्व बुद्धांनी त्यांना सांगितले.

12) हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास परिव्राजक अधीर झाले आणि ते स्पष्ट करुन सांगण्याविषयी त्यांनी बुद्धांना विनंती केली.

13) तथागत बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली.

3. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- विशुद्धी मार्ग


🌷3. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- विशुद्धी मार्ग 🌷

The Buddha's First Sermon- The Path of Purity
*************************

1) परिव्राजकांनी नंतर बुद्धांना आपला धम्म समजावून सांगण्याची विनंती केली.

2) बुद्धांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली.

3) त्यांनी प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला.

4) त्यांनी परिव्राजकांना सांगितले की, "ज्याला चांगला व्यक्ती होण्याची इच्छा आहे, त्याने 'जीवनाची तत्त्वे' म्हणून काही तत्त्वे पाळली पाहिजेत (must recognise some principles as principles of life). ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे."

5) "माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची तत्त्वे अशी आहेत:
i)  कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे
ii) चोरी न करणे किंवा दुसऱ्याच्या मालकीची कोणतीही वस्तू स्वतःची न समजणे व गैरवापर/अपहार न करणे
iii) व्यभिचार न करणे
iv) असत्य न बोलणे
v)  मादक पेय ग्रहण न करणे."

6) "माझे असे म्हणणे आहे की, प्रत्येक माणसाने ही तत्त्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मुल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की, ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करु शकेल (For every man must have a standard by which to judge whatever he does). आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे ही पाच तत्त्वे किंवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहेत."

4.बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- अष्टांग मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग



🌷4.बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- अष्टांग मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग🌷

The Buddha's First Sermon- Ashtanga Marga or The Path of Righteousness
*************************

1) नंतर बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांग मार्गाविषयी प्रवचन दिले. बुद्धांनी सांगितले की अष्टांग मार्गाचे आठ घटक आहेत.
(सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती)

2) अष्टांग मार्गाचे पहिले व सर्वात महत्वाचे अंग 'सम्मा दिट्ठी' (सम्यक दृष्टी) Right View. याच्या स्पष्टीकरणाने बुद्धांनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली.

3) "सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरिता," बुद्ध परिव्राजकांना म्हणाले:

4) "परिव्राजकहो, जग ही एक अंधारकोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे."

5) "ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही."

6) "खरोखर, दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे; इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते."

7) "मन हे एक असे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो."

8) "तथापि, या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल."

9) "त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते."

10) "अशा प्रकारे त्यांची आकलनशक्ती स्वभावतःच सदोष असते."

11) "परंतु परिव्राजकहो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या."

12) "कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते."

13) "कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशाप्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल की, शेवटी त्याची गतिमान इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त व स्वतंत्र करील."

14) "अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील."

15) "आपणाला पाहिजे त्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण आहे (This is because it is possible to train the mind in whatever directions one chooses). मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते."

16) "पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करु शकते."

17) "सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय."

18) "सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे?", परिव्राजकांनी विचारले. बुद्धांनी उत्तर दिले, "अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे."

19) "मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख दूर करण्याचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय." 
20) "सम्यक दृष्टीकरिता माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे आवश्यक आहे."  

21) "सम्यक दृष्टीकरिता माणसाने अंधश्रद्धा व अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. (निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये)"

22) "ज्या सिद्धांताना (doctrines) वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत."

23) "स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत."

24) "प्रत्येक माणसाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात (aims, aspirations and ambitions). अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी (noble and praiseworthy). ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी. हा 'सम्यक संकल्पा' चा आशय आहे."

5. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- शीलमार्ग


🌷5. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- शीलमार्ग 🌷

The Buddha's First Sermon- The Path of Virtue
*************************
Ten Paramitas:
(1)Sila; (2)Dana; (3)Uppekha; (4)Nekkhama; (5)Virya; (6)Khanti; (7)Succa; (8)Adhithana; (9)Karuna; (10)Maitri
*************************
1) नंतर तथागत बुद्धांनी परिव्राजकांना शीलमार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला.

2) त्यांनी त्यांना सांगितले की शीलमार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय:
(१)शील (२)दान (३)उपेक्षा (४)नैष्कर्म्य (५)वीर्य (६)शान्ती (७)सत्य (८)अधिष्ठान (९)करुणा आणि (१०)मैत्री

3) या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी बुद्धांना विचारला.

4) त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बुद्ध म्हणाले:-

5) "शील म्हणजे नीतिमत्ता (moral temporament). वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल; अपराध करण्याची, चुकीचे वागण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील."

6) "नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग."

7) "स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह यांचे दान करणे (giving); इतकेच नव्हे तर स्वतःचे जीवन देणे म्हणजेच "दान" होय."

8) " "वीर्य" म्हणजे योग्य (सम्यक्) प्रयत्न व परिश्रम. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य."

9) "शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही; तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो."

10) " "सत्य" म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये."

11) " "अधिष्ठान" म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय." (resolute determination to reach the goal)

12) " "करुणा" म्हणजे सर्व मानवांविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता." (loving kindness)

13) " "मैत्री" म्हणजे सर्व प्राण्यांविषयी; मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील; मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर जीवमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे." (extending fellow feeling to all beings)

14)" "उपेक्षा" म्हणजे उदासीनतेपासून निराळी अशी अलिप्तता. अनासक्ती. आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. परिणामांनी विचलित न होणे; परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा."

15) "आपल्या संपूर्ण कुवतीनुसार प्रत्येकाने परोपरीने या सद्गुणांचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता (पूर्णत्वाच्या अवस्था) असे म्हणतात." (States of Perfection)



🌷🌿🌸🌷🌸🌿🌷
*****************************
बुद्ध आणि त्यांचा धम्म 
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर  
द्वितीय खंड-भाग दुसरा
*****************************
🌷🌿🌸🌷🌸🌿🌷
*****************************
*****************************

पुढील भागात:
६. बुद्धांचे पहिले प्रवचन (अंतिम भाग)
*********************

6. बुद्धांचे पहिले प्रवचन (अंतिम भाग)



🌷6. बुद्धांचे पहिले प्रवचन (अंतिम भाग) 🌷


The Buddha's First Sermon (concluded)
*************************


1) बुद्धांनी आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यावर परिव्राजकांना विचारले,


2) "व्यक्तीगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय?" त्यांनी उत्तर दिले, "आपण म्हणता ते खरोखर आहे."

3) नंतर तथागत बुद्धांनी विचारले, "लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चोरी, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तीगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तीगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसामध्ये जर व्यक्तीगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, "आपण म्हणता तसेच आहे."

4) "आणखी असे की, दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काहीच का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय?" आणि परिव्राजक उत्तरले, "बरोबर आहे."

5) "जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा- सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मान्त, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा; थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय?" त्यावर ते म्हणाले, "होय."

6) "शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करुन बुद्धांनी विचारले, "गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निःस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची (Nekkhamma) आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय?"

7) "माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय?" आणि ते म्हणाले, "होय."

8) "याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निःपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज दुसऱ्या कशाने मिळू शकेल?"

9) ते सर्व म्हणाले, "होय."

10) "परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची-बुद्धीची- जोड दिली पाहिजे." (intelligence)



11) तथागतांनी विचारले, "प्रज्ञा आवश्यक नाही काय?" परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी तथागत पुढे म्हणाले, "दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी वाईट मार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसांच्या अंगचे गुण होत." परिव्राजक म्हणाले, "होय, ते बरोबर आहे."


12) "परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय?" तथागतांनी विचारले.
"मी म्हणतो, नाही. हे पुरेसे नाही," तथागत परिव्राजकांस पुढे म्हणाले. "हेच जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण लहान मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करु शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही, त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही; त्या अर्थी आईचे दुध पिण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही."

13) "प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी (understanding and intelligence) हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे."

14) "प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे. परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे; परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे. प्रज्ञा पारमिता हे शहाणपणाचेच (wisdom) दुसरे नाव आहे."

15) माझे म्हणणे असे आहे की, अकुशल कर्म (wrong conduct) कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म (right conduct) कोणते आणि अकुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो कि प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे."

16) नंतर परिव्राजकांना पुढीलप्रमाणे इशारा देऊन (admoniton) बुद्धांनी आपले प्रवचन संपविले:

17) "माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे; कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधतो. मी असे सांगतो की, माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टीकोन चुकीचा ठरेल."

18) "माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही. परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरु नका."

19) "माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे." (hope and purpose)

20) "माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय."

21) "या धम्मात आशा आहे. कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो."

22) "तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही?" आणि परिव्राजक म्हणाले, "होय, आम्हाला मान्य आहे."

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************
बुद्ध आणि त्यांचा धम्म 
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
द्वितीय खंड-भाग दुसरा
*****************************
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************
पुढील भागात:
७. परिव्राजकांची प्रतिक्रिया
*********************

7. परिव्राजकांची प्रतिक्रिया


 7. परिव्राजकांची प्रतिक्रिया 🌷
**********
The Response of the Parivrajakas
*************************

1) हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची त्या पाच परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा (new approach) त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले: "जगाच्या इतिहासात आजपर्यंत 'मानवी दुःखाचे अस्तित्व ओळखणे हाच धर्माचा खरा पाया आहे' हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही."

2) "जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही धर्मसंस्थापकाने हे सांगितले नाही की, हे मानवी दुःख दूर करणे हाच धर्माचा खरा उद्देश आहे."

3) "जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतःच इतका सरळ आणि साधा; अद्भुतता आणि अतिमानवी शक्तीपासून इतका मुक्त, आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही."

4) "जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की, ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी (commands are born of the examination of the social needs of man) निर्माण झालेल्या आहेत."

5) "जगाच्या इतिहासात मुक्ती (salvation, मोक्ष) हे असे सुखाचे वरदान आहे की, जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करावयाचे असते; हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही."

6) बुद्धांच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या.

7) जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि तो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे, जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे, याच जगात, याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक ह्रदयपरिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्व, विरोधी मतांची जाणीव असून जाणूनबुजून पुढे मांडण्याचे ज्याच्यात धैर्य आहे, अशा बुद्धांच्या रुपाने एक समाजसुधारक (reformer) लाभला आहे असे त्यांना वाटले.

8) तथागतांविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते पाच परिव्राजक त्यांना ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी बुद्धांना विनंती केली.

9) "एहि भिक्खवे" (भिक्खुंनो या) हे शब्द उच्चारुन बुद्धांनी त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करुन घेतले. ते "पंचवर्गीय भिक्खू" म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले.

*****************************
तथागत भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन समाप्त 

*****************************
🌷🌿🌸🌷🌸🌿🌷
*****************************
बुद्ध आणि त्यांचा धम्म 
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर  

द्वितीय खंड-भाग दुसरा
*****************************

🌷🌿🌸🌷🌸🌿🌷

*****************************