आहार

मोग्गलान नावाच्या व्यक्तीला भगवान बुद्ध सांगतात की ते श्रमणाला  क्रमाक्रमाने एकेक पाठ देत टप्प्याटप्प्याने  क्रमिक शिक्षण देतात. सराव करून पुढील पाठ घेत घेत अंतिमतः श्रमणांना मनोनिग्रह साधणे शक्य होते. यातील एका टप्प्यावर तथागत श्रमणांना अन्नभक्षणाचा निग्रह शिकवतात:

तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ देतात. बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणिवेने स्वतःला संयमित कर. दुसरा पाठ देतात कि डोळ्याने वस्तू पाहिल्याने किंवा इतर इंद्रियांनी जाणवणाऱ्या तपशिलाने भारावून जाऊ नकोस; जसे आवाज, वास, रुची, स्पर्श यामुळे मोहून जाऊ नकोस. यानंतर ते श्रमणाला पुढील पाठ देतात:
''श्रमणा, ये. हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर-सौष्ठव राखण्यासाठी खाऊ नकोस. तर स्वास्थ्य व शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे. जेवत असताना मनात सतत हा विचार असावा कि, 'मी माझ्या वेदनांचा (feelings) निग्रह करीत आहे. नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल.'' 

(Be moderate in eating; earnest and heedful do you take your food. Not for sport, not for indulgence, not for adding personal charm to the body; but do it for body stabilising, for its support, for protection from harm and for keeping up the practice of the righteous life; with this thought: ''I check my former feeling. I will not give rise to another feeling. Maintenance and comfort may be mine.'')

(संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म )

विचारांवर काळजीपूर्वक नियंत्रण

नव्यानेच श्रमण झालेल्या अनुयायांसोबत तथागत विहाराकडे जात होते. त्याचवेळी जोरात पाऊस सुरु झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घरात त्यांनी प्रवेश केला; पण घराचे छत गळत होते आणि तिथे पावसापासून संरक्षण मिळणे शक्य नव्हते. तेव्हा बुद्ध त्या श्रमणांना म्हणाले, ''ज्याप्रमाणे घराचे छप्पर नीट शाबूत नसल्याने पावसाचे पाणी घरात येते व घराचे नुकसान करते, त्याप्रमाणे ज्या वेळी आपले आपल्या विचारांवर काळजीपूर्वक नियंत्रण नसते, त्यावेळी वासना व वाईट विकार आपल्या सर्व चांगल्या संकल्पनांना पोखरून काढतात.''

ते पुढे म्हणाले, ''परंतु ज्या वेळी छत मजबूत असते, त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही; त्याचप्रमाणे आपल्या चित्तवृत्तींवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक आचरण केले तर वासना/ नुकसानकारक विचार निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत.'' 

( 'Controlling one's thoughts' and 'acting with reflection' to prevent desires from arising and disturbing us)

Ref: Buddha and His Dhamma, Dr B.R.Ambedkar