प्रस्तावना


Post_ ( i )

***********************
🌷*बुद्ध आणि त्यांचा धम्म*🌷
***********************

*प्रस्तावना*


*(बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 15 मार्च 1956 ला लिहिलेली प्रस्तावना)*


(Part of the Preface.... this will be corrected and completed in a short time)
माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी मला कठोर धार्मिक शिस्तीत लहानाचे मोठे केले. लहानपणी मला माझ्या वडिलांच्या धर्मजीवनातही काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते. त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता.

त्यांनी आपल्या पंथाची पुस्तके वाचून काढली होती. त्याचबरोबर ते मला आणि माझ्या थोरल्या भावाला रोज झोपायला जाण्यापूर्वी रामायण, महाभारतातील काही उतारे आमच्या घरी येणाऱ्या लोकांना व तसेच माझ्या बहिणींना वाचून दाखवायला सांगत. हा प्रकार बरीच वर्षे सुरु होता.

मी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माझ्या जातीच्या लोकांना ती घटना जाहीर सभेतून कौतुक करण्यासारखी वाटली, पण माझ्या वडिलांनी या गोष्टीला परवानगी दिली नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात हवा शिरेल अशी त्यांची धारणा होती. शिवाय एक परीक्षा पास होण्यापलिकडे मी विशेष काय केले होते? माझ्या वडिलांनी नकार दिल्याने नाराज झालेली मंडळी दादा केळूस्करांकडे गेली. केळूस्करांनी माझ्या वडिलांना भेटून त्यांचे मन वळविले. ते या प्रकारची सभा घेण्यास राजी झाले. दादा केळूसकर हे त्या सभेचे अध्यक्ष होते. त्यावेळी मला त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्धजीवनावरील पुस्तक भेट म्हणून दिले. मी ते पुस्तक उत्सुकतेने वाचले आणि त्यातील काही प्रसंगानी मी अक्षरशः भारावून गेलो.

माझ्या वडिलांनी आपल्याला यापूर्वीच बौद्ध वाङमयाचा परिचय का घडवून दिला नाही, असे मला वाटले. मी त्यांना सरळच विचारले की, ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आहे आणि शुद्र आणि अस्पृश्यांची नालस्ती केली आहे ते महाभारत व रामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले? माझ्या वडिलांना माझा प्रश्न रुचला नाही व मूर्खासारखे प्रश्न करु नकोस, म्हणून त्यांनी मला गप्प बसवले.

माझे वडील स्वतःची हुकुमत गाजवणाऱ्या वृत्तीचे होते. पण तरीही मी धैर्य धरुन त्यांच्याशी बोलत होतो. काही दिवसांनी मी पुन्हा त्यांना याबद्दल विचारले. त्यावेळी ते म्हणाले, आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. महाभारत आणि रामायण यांच्या वाचनाने तुझा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. द्रोण आणि कर्ण अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यत पोचली हे पाहण्यासारखे आहे. वाल्मिकी हा कोळी असूनही तो रामायणाचा कर्ता झाला. त्यामुळेच न्युनगंड दूर व्हावा म्हणून मी तुला रामायण-महाभारत वाचावयास सांगितले. मला माझ्या वडिलांच्या युक्तिवादात तथ्य आढळले.

माझ्या वडिलांनी जो युक्तिवाद केला त्यात बरेच तथ्य होते. पण त्या युक्तिवादाने माझे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्तीरेखा माझ्या मनाला भुरळ घालू शकली नाही, हे मी माझ्या वडिलांना स्पष्ट शब्दांत सांगितले. मी म्हटले, मला भीष्म, द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाही. भीष्म आणि द्रोण मला ढोंगी वाटतात, तर कृष्णाला लांडीलबाडी करण्यात संकोच वाटत नाही. त्यांचे सारे जीवन त्याच प्रकाराने भरलेले आहे. तसेच मला रामही आवडत नाही. त्यांची शूर्पणखेशी वागणूक पहा, वाली-सुग्रीव प्रकरणात त्याची वर्तणूक पहा आणि सीतेला त्यांनी दिलेली क्रूर वागणूक पहा.

माझे वडील माझ्या बोलण्यावर चूप राहिले. ते त्यावर बोलले नाहीत. माझ्या मनात बंड उद्भवले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच मी बुद्धाकडे वळलो. त्यांच्याकडे मी निर्विकार मनाने झुकलेलो नाही, तर निश्चित विचाराने मला बुद्धाने भुरळ घातली. इतर व्यक्तीरेखांशी साम्य-भेदाने त्या वयातही बुद्ध मला आवडले.

बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयीची माझी उत्सुकता ही अशी माझ्या लहानपणापासून निर्माण झाली आहे. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला निराळ्या कारणांनी मिळाली. कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटी मुखपत्राच्या संपादकांनी 1951 साली मला त्यांच्या वैशाखी विशेषांकासाठी खास लेख लिहिण्यास सांगितले होते. त्या लेखात मी असा युक्तीवाद केला होता की, विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारील असा बुद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे. त्याविना हा समाज नष्ट होईल. मी त्यात असे विवेचन केले होते की, या आधुनिक जगात बुद्धधर्म हा असा एकच धर्म आहे जो मानव जातीचे रक्षण करु शकेल.

बौद्धधर्माची प्रगती अत्यंत हळू झाली याचे कारण त्याचे वाङमय (साहित्य) इतके आहे की, ते कुणी संपूर्ण वाचू शकणार नाही. आणि ख्रिश्चनांप्रमाणे त्यांचा स्वतःचा असा बायबल सदृश्य ग्रंथ नाही. मी तो लेख लिहिताच तशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याविषयी अनेकांनी मला पत्राने कळविले. त्या पत्रांनुसार मी हा ग्रंथ लिहिण्याचे मनावर घेतले.

हा ग्रंथ किती चांगला उतरला आहे, हे वाचकांनी ठरवायचे आहे. ग्रंथात मी काही नवीन सांगितले आहे असा माझा दावा नाही. मी फक्त बौद्ध विचारांचे संपादन केले आहे. त्याची मांडणी वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. मी ते सारे सोप्या आणि सहज समजेल अशा शब्दांत मांडले आहे.

*बौद्ध धर्माचे सम्यक ज्ञान व्हावे यासाठी जी तीन पुस्तके आहेत; त्यापैकी हे एक पुस्तक आहे. इतर दोन पुस्तके आहेत:*
*1) बुद्ध आणि कार्ल मार्क्स*
*2) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती.* हे ग्रंथही मी वेगळे लिहून प्रसिद्ध करण्याच्या विचारात आहे.

- बोधिसत्त्व बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर.
💐🌷💐🌷💐🌷

"बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाच्या पोस्ट क्रमाने दररोज वाचा. मूळ इंग्रजी ग्रंथाचे हे मराठी भाषांतर आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ इंग्रजी आवृत्ती बघावी. 


For English (original) version, the following link can be referred:



No comments:

Post a Comment