

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy


Conversion of the Kassyapas
*************************
30) काश्यप हा एक अहंमन्य पुरुष होता. परंतु तथागतांच्या विधानांतील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करुन आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करुन त्याने हे मान्य केले की, जगद्वंद्य तथागतांच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही.
31) आणि अखेर खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने तथागतांचा सिद्धांत मान्य करुन उरुवेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला.
32) गुरुला अनुसरुन काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्यांचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णतः दीक्षा देण्यात आली.
33) नंतर उरुवेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरुन तरंगत खाली वाहत गेल्या.
34) प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहात असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादि सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहून येत असलेल्या पाहिल्या तेव्हा ते म्हणाले, "या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत. त्याने त्या कां फेकून दिल्या? काही तरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे." ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या पाचशे अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले.
35) त्याला व त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. बुद्धांच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेला काश्यपाने त्यांना सांगितली.
36) "आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्यांचे अनुकरण केले पाहिजे," असा त्यांनी विचार केला.
37) त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या दोन भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी तथागतांचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले.
38) तेथे जमलेल्या लोकांना दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, "लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नि बाहेर पडतो, तसा विचाराच्या गोंधळामुळे अग्नि निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो."
39) "काम, क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील सर्व चांगल्या गोष्टींना भस्मसात करतात; व त्यामुळे दुःख निर्माण होते."
40) "एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्याच्याबरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो."
41) "म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की, तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो."
42) तथागतांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महान ऋषींचा अग्निपुजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि तथागतांचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
43) काश्यपांची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता. कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता.









No comments:
Post a Comment