पोस्ट नं 98

📚 पोस्ट नं 98 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
🌷2. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा (ii) 🌷
Conversion of the Kassyapas
*************************

14) काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करु लागले.

15) नंतर काश्यप म्हणाला, "वाद करण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करु शकता."

16) तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले.

17) नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला. परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले.

18) तथागत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मुचलिंदाला वाटले की, आपण एका महान विभूतीच्या सान्निध्यात आलो आहोत. आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करु लागला.

19) आपल्या अभ्यगताचे काय झाले असेल या काळजीने ग्रस्त झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही. बहुदा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भितभित उठला.

20) सकाळी कश्यप आणि त्याचे एकूण एक अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले. मुचलिंदाकडून बुद्धांना काही दुखापत झालेली त्यांना दिसली नाही. उलट मुचलिंद तथागतांची पूजा करीत असल्याची योजना आढळली.

21) हे दृश्य पाहून काश्यपाला असे वाटले की, आपण एक महान चमत्कार पाहात आहोत.

22) या चमत्काराचा परिणाम होऊन कश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले.

23) तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले.

24) त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. कश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता; आणि तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल.

25) पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखविली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही; असे त्याला वाटले.

26) एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले. आणि त्यांनी कश्यपाला विचारले, "तुम्ही अर्हन्त आहात काय?"

27) "जर तुम्ही अर्हन्त नसाल तर या अग्नीहोत्रामुळे काय हित होणार आहे?"

28) काश्यप म्हणाला, "अर्हन्त होणे म्हणजे काय आहे हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करुन सांगाल का?"

29) नंतर तथागत काश्यपाला म्हणाले, "अष्टांग मार्गापासून परावृत्त करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अर्हन्त. अग्नीहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही."

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷

No comments:

Post a Comment