पोस्ट नं 93

📚 पोस्ट नं 93 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग दुसरा- परिव्राजकांची धम्मदीक्षा
Conversion of Parivrajakas
🌷6. बुद्धांचे पहिले प्रवचन (अंतिम भाग) (ii) 🌷
The Buddha's First Sermon (concluded)
*************************

11) तथागतांनी विचारले, "प्रज्ञा आवश्यक नाही काय?" परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी तथागत पुढे म्हणाले, "दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी वाईट मार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसांच्या अंगचे गुण होत." परिव्राजक म्हणाले, "होय, ते बरोबर आहे."

12) "परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय?" तथागतांनी विचारले.
"मी म्हणतो, नाही. हे पुरेसे नाही," तथागत परिव्राजकांस पुढे म्हणाले. "हेच जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण लहान मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करु शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही, त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही; त्या अर्थी आईचे दुध पिण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही."

13) "प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी (understanding and intelligence) हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे."

14) "प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे. परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे; परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे. प्रज्ञा पारमिता हे शहाणपणाचेच (wisdom) दुसरे नाव आहे."

15) माझे म्हणणे असे आहे की, अकुशल कर्म (wrong conduct) कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म (right conduct) कोणते आणि अकुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो कि प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे."

16) नंतर परिव्राजकांना पुढीलप्रमाणे इशारा देऊन (admoniton) बुद्धांनी आपले प्रवचन संपविले:

17) "माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे; कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधतो. मी असे सांगतो की, माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टीकोन चुकीचा ठरेल."

18) "माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही. परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरु नका."

19) "माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे." (hope and purpose)

20) "माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय."

21) "या धम्मात आशा आहे. कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो."

22) "तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही?" आणि परिव्राजक म्हणाले, "होय, आम्हाला मान्य आहे."

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷

No comments:

Post a Comment