पोस्ट नं 86

📚 पोस्ट नं 86 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग दुसरा- परिव्राजकांची धम्मदीक्षा
Conversion of Parivrajakas
🌷2. बुद्धांचे पहिले प्रवचन (ii) 🌷
The Buddha's First Sermon
*************************

10) "ही दोन्ही आत्यंतिक टोके (extremes) ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मार्गाची शिकवण देत आहे."

11) त्या पाच परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले की, "आपणाला आम्ही सोडून आल्यानंतर आपण काय काय केले?" तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यावर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला हे सर्व बुद्धांनी त्यांना सांगितले.

12) हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास परिव्राजक अधीर झाले आणि ते स्पष्ट करुन सांगण्याविषयी त्यांनी बुद्धांना विनंती केली.

13) तथागत बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली.

14) सुरुवातीलाच तथागतांनी त्यांना सांगितले की, आपला जो मार्ग, जो धम्म आहे, त्याला "ईश्वर" आणि "आत्मा" यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा "कर्मकांडाशी" काही संबंध नाही (rituals and ceremonies).

15) "माणूस" आणि "माणसाचे माणसाशी या जगातील नाते" हा तथागत बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे.

16) बुद्धांनी सांगितले की, आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. (first postulate)

17) मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यांत राहात आहे हे त्याचे दुसरे आधारतत्त्व आहे. हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. (To remove this suffering from the world is the only purpose of Dhamma.)

18) दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच तथागत बुद्धांच्या धम्माचा पाया व मूलाधार आहे.

19) हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे.

20) "खरोखरच, हे परिव्राजकहो! जगातील दुःख आणि दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे, हे ज्या श्रमणांना आणि ब्राम्हणांना (धर्मोपदेशकांना) समजत नाही ते माझ्या मते, श्रमण आणि ब्राम्हण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा खराखरा अर्थ काय आहे हे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही."

21) नंतर परिव्राजकांनी बुद्धांना विचारले, "दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा."

22) बुद्धांनी सांगितले की, या धम्मानुसार जर प्रत्येकाने खालील मार्गांचे अनुसरण केले तर त्यामुळे या दुःखाचा अंत होईल:
i) विशुद्धी मार्ग (the Path of Purity),
ii) सदाचरणाचा मार्ग (the Path of Righteousness) आणि
iii) शीलमार्ग (the Path of Virtue)

23) आणि अशा धम्माचा अविष्कार आपण केला आहे, असे तथागत पुढे म्हणाले.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
3. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- विशुद्धी मार्ग
*********************

No comments:

Post a Comment