पोस्ट नं 72

📚 पोस्ट नं 72 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
🌷3. 'ब्राह्मणे' (iv) 🌷
The Bramhanas
*************************

38) त्यांना हे स्पष्ट दिसले की, चातुर्वण्याने सर्वांच्या हितसंबधाकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही. तर खरोखर मूठभर लोकांच्या हितासाठी, बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणूनबुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले.

39) दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळवणूक करण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती.

40) बंडाची प्रवृत्ती (spirit of revolt) पूर्णपणे मारुन टाकण्यासाठीच ब्राम्हणांनी कर्मवाद तयार केला होता; असे बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करुन बदलू शकत नव्हता; कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरविण्यात आली होती.

41) ब्राम्हणी तत्त्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करुन टाकली होती त्या 'शूद्र आणि स्त्रिया' या दोन वर्गांना या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते.

42) विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राम्हणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करुन टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राम्हणी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करु लागले.

43) शस्त्र धारण करणे हा मानवी स्वातंत्र्य मिळविण्याचा शेवटचा उपाय आहे. परंतु शूद्रांना शस्त्र धारण करणे नाकारण्यात आले होते.

44) ब्राम्हणी धर्माच्या वर्चस्वाखाली 'स्वार्थी ब्राम्हणी व्यवस्था', 'सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय' आणि 'धनवान वैश्य' यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करुन ठेवण्यात आले होते.

45) अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्य होते काय? ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणित समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धांना माहीत होते. ती फक्त संपवून टाकणेच शक्य होते.

46) या कारणांसाठी, 'खऱ्या जीवनमार्गाला विरोधी' असे असल्याने 'ब्राम्हणी तत्त्वज्ञान' बुद्धांनी अमान्य केले.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
४. उपनिषदे आणि त्यांची शिकवण
*********************

No comments:

Post a Comment