पोस्ट नं 69

📚 पोस्ट नं 69 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
🌷3. 'ब्राह्मणे' (i) 🌷
The Bramhanas
*************************

1) वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ 'ब्राम्हणे' या नावाने ओळखले जातात. दोघांनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राम्हणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारखेच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना 'श्रुति' या नावाने संबोधितात.

2) ब्राम्हणी तत्त्वज्ञान चार सिद्धांतांवर आधारलेले आहे.

3) पहिला सिद्धांत असा की, वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक (infallible) आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. (not to be questioned)

4) ब्राम्हण तत्त्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की, योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राम्हणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते; म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते.

5) वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राम्हणापाशी होती असे नव्हे; तर आदर्श समाजाविषयी त्यांची एक कल्पना होती.

6) या आदर्श समाजरचनेला त्यांनी "चातुर्वर्ण्य" असे नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदात सांगितलेली आहे. आणि ज्याअर्थी वेद हे स्खलनातीत व वादातीत आहेत; त्याअर्थी समाजरचनेची चातुर्वर्ण्य पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे.

7) ही समाजपद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती.

8 ) पहिला नियम असा की, समाज चार वर्णांत विभागला जावा:
1)ब्राम्हण 2)क्षत्रिय 3)वैश्य आणि 4)शूद्र

9) दुसरा नियम असा की, या वर्णांत सामाजिक समता असू शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजे.

10) सर्वांच्या वर ब्राम्हण असले पाहिजे. ब्राम्हणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय; क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य; आणि शुद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत.

11) हक्क आणि अधिकार (rights and privileges) यांच्या बाबतीत या चार वर्णांत समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमावर आधारलेला होता.

12) ब्राम्हणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते हक्क आणि अधिकार असत. पण ब्राम्हणाला जे हक्क आणि अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत; पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत. आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच; पण खास हक्क तर मुळीच नव्हते. तीन वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता.

13) चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम हा "व्यवसायाच्या विभागणी संबंधी" होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राम्हणाचा व्यवसाय होता. क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे हा होता. व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आला होता. आणि तीन वर्गांची सेवा करणे हा शुद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णासाठी होते. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे.

14 ) चातुर्वर्ण्याचा चौथा नियम "शिक्षणाच्या हक्कासंबंधी" होता. चातुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्क शूद्रांना नाकारण्यात आला. ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील "स्रियांना" देखील तो नाकारण्यात आला.

15) चातुर्वर्ण्याचा पाचवा नियम होता. या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला "ब्रम्हचर्य" म्हणत. दुसऱ्याचे नाव "गृहस्थाश्रम" असे होते. तिसऱ्याला "वानप्रस्थ" आणि चवथ्या आश्रमाला "संन्यास" अशी नावे होती.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
३. ब्राह्मणे (ii)
*********************

No comments:

Post a Comment