पोस्ट नं 67

📚 पोस्ट नं 67 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
🌷2. 'तत्त्ववेत्ता कपिल' (ii) 🌷
Kapila - The Philosopher
*************************

12) असत् (non-existent) हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तवतः नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सुष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरुपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरुपाचीच वस्तू तयार होऊ शकते. आणि काही विशिष्ट स्वरुपाच्या पदार्थापासून विशिष्ट स्वरुपाचा पदार्थ निर्माण होतो.

13) मग या इंद्रियगोचर विश्वाचे मूळ कोणते?

14) कपिल म्हणतो उत्क्रान्त वस्तू (व्यक्त) आणि अनुक्रांत (अव्यक्त) वस्तू यांनी हे इंद्रियगोचर विश्व बनले आहे. (empirical universe consists of things evolved and things that are not evolved)

15) व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाहीत.

16) व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो. आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरुप, त्याच्याशी तर हे विसंगत आहे.

17) सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते. आणि म्हणून कोणतीही एक वस्तू दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्याअर्थी त्या सर्व एखाद्या मूळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाहीत.

18) नंतर कपिलाने असे विधान केले आहे की, जरी कार्य हे कारणाचे बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे.

19) अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान कां होऊ शकत नाही, तिच्यायोगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रियगोचर कां होत नाही? याचे कपिलाने पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे:

20) "त्याची कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की, ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते, अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत. त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरुपामुळे त्या इंद्रियगोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे किंवा तत्सदृश पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकांचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील."

21) कपिलाला विचारण्यात आले, "मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो?"

22) कपिलाने उत्तर दिले, "व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंना ही कारण असते. पण दोघांचेही मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते."

23) "व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्यांचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रीय आणि एकसंघ असते."

24) कपिल म्हणतो की, अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया 'सत्व, रजस आणि तमस्' या तिच्या तीन घटकांमुळे घडत असते. यांना तीन गुण असे म्हणतात.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
२. तत्त्ववेत्ता कपिल (iii)
*********************

No comments:

Post a Comment