पोस्ट नं 65

📚 पोस्ट नं 65 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
🌷1. 'बुद्ध आणि वैदिक ऋषी' (ii)🌷
The Buddha and the Vedic Rishis
*************************

11) अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू (air) हे मूलतत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्यशक्ती असते. त्याच्यात निर्मितीतत्व निसर्गतःच असते.

12) दीर्घतमा याने सांगितले की, सर्व प्राणिमात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढेमागे सरकत असतो.

13) सूर्य करडया रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात.

14) सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याची बीजे होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते.

15) नारायणाच्या मतानुसार पुरुष (परमेश्वर) हे पहिले जगत्कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतु, पक्षी, सर्व पशू, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पती पुरुषांपासून होते.

16) तात्त्विकदृष्टया हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ (बीज). या विश्वाच्या महान शक्तीपासूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली.

17) हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौरतत्त्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्त्व अग्नीपासूनच बनले आहे.

18) अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूळ पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करुन त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या, अर्धवट आणि असमाधानकारक होत. रुपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्यशक्ती, निर्मिती तत्त्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच.

19) विश्वकर्म्याचे मत असे होते कि परमेश्वर ही चैतन्यशक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतीही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे तो अज (जन्म नसलेला) unborn one आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहित आहे.

20) बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. फक्त दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अति प्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले.

21) परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळले नाही.

22) त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत.

23) म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले.

24) त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. सत्य प्राप्त करुन घेण्यासाठी ते चाचपडत होते; परंतु ते त्या सत्याप्रत पोचले नाहीत.

25) त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत.

26) म्हणून वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
२. तत्त्ववेत्ता कपिल
*********************

No comments:

Post a Comment