

*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
The Buddha and His Predecessors


The Buddha and the Vedic Rishis
*************************
1) वेद हा मंत्रांचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करतात त्यांना "ऋषी" म्हणतात.
2) मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापति, ब्रम्ह, महिर्दि, यम इ. देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत.
3) धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, भक्तांकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय.
4) वेदांमध्ये फारसे तत्वज्ञान नाही. परंतु असे काही वैदिक ऋषी होते की, ज्यांनी तात्विक स्वरुपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या.
5) 1)अघमर्षण, 2)प्रजापती परमेष्ठि, 3)ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती, 4)अनिल, 5)दीर्घतमा, 6)नारायण, 7)हिरण्यगर्भ आणि 8)विश्वकर्मा हे ते ऋषी होत.
6) या वैदिक तत्त्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या: जग उत्पन्न कसे झाले? वस्तूंची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली? त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे? निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे?
7) अघमर्षण म्हणतो कि जग तपसपासून (उष्णतेपासून) निर्माण झाले. हे निर्मितीक्षम तत्त्व होय. त्यापासून अनाद्यनन्त असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र (तमस्) उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली.
8 ) ब्रह्मणस्पतीने 'असत्' पासून 'सत्' ची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला (being from non-being). त्याने 'असत्' या शब्दाचा अर्थ अनादी अनंत असा सांगितला. सत् हे मूलतः असत् पासून उत्पन्न झाले. जे जे सत् (अस्तित्वात असलेले) आहे, आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत् (अस्तित्वात नसलेले) आहे, त्या सर्वांचा असत् हा मूलाधार आहे.
9) प्रजापति परमेष्ठीने "असत् पासून सत् निर्माण झाले काय?" या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे की, या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही. त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्यांच्या मते मूळ पदार्थ - जे पाणी - ते सत् आणि असत् यांच्या व्याख्येत बसत नाही.
10) परमेष्ठीने जडत्व आणि चेतना (matter and motive power) यांत भेद केला नाही. त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रुपातंर विशिष्ट वस्तूमध्ये करुन घेते. या तत्वाला 'काम' किंवा 'वैश्विक इच्छा' असे नाव त्याने दिले.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
१. बुद्ध आणि वैदिक ऋषी (ii)
*********************
No comments:
Post a Comment