पोस्ट नं 63

📚 पोस्ट नं 63 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग चवथा- ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी
🌷 4. 'बोधिसत्त्व गौतम' सम्यक संबोधीनंतर 'बुद्ध' होतात (ii) 🌷
Gautama who was a Bodhisatta, after Sammabodhi becomes a Buddha
*************************

13) या अवस्थेत असताना त्यांना धर्माचे ज्ञान होते; परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच ते त्याची त्यांना ओळख करुन देतात. आपण व्यवहारचातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्यांना कळते. लोकांनी त्यांना कितीही त्रास दिला तरी ते शांत वृत्तीने तो त्रास सहन करतात; कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करुन घेतले आहेत हे त्यांना कळलेले असते. परंतु त्याच वेळी प्राणिमात्राचे कल्याण करण्याविषयीचा त्यांचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही (wisdom) ते पाठ फिरवित नाहीत. म्हणून दुर्दैव त्यांना सन्मार्गावरुन कधीही पराजित करु शकत नाही.

14) जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो "अचल" होेतो. या अढळ अवस्थेत बोधिसत्त्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते ते स्वाभाविकतःच अनुसरत ते जी जी गोष्ट करतील त्या त्या गोष्टीत तथागत यशस्वी होतात.

15) जीवनाच्या नवव्या अवस्थेत तथागत "साधुमती" होतात. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे, व्यवस्था आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होेतो अशाची साधुमति ही अवस्था असते.

16) जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो "धर्ममेघ" होतो. बोधिसत्त्वाला बुद्धांची अनंत दिव्यदृष्टी प्राप्त होते.

17) बोधिसत्त्व ही दहा सामर्थ्य प्राप्त करुन घेतो; कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते.

18) बोधिसत्त्वाची स्थित्यंतरे होत असताना त्यांनी ही दहा सामर्थ्य मिळवली पाहिजेत; इतकेच नव्हे तर त्याने "दहा पारमितां" चाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे.

19) एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण असता कामा नये.

20) अशा प्रकारे बोधिसत्त्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो 'बुद्ध' होतो. बुद्ध हा बोधिसत्त्वाच्या जीवनातील कळस होय.

21) बोधिसत्त्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत ईश्वराच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो.

22) जातकसिद्धांत हा बुद्धांच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे.

23) अवतारवादात ईश्वराच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की ईश्वर निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो; मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते.

24) बुद्ध होण्यासाठी बोधिसत्त्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थेतूनच गेले पाहिजे; या सिद्धांताला दुसऱ्या कुठेही तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही.

*************************
🌷 भाग चवथा- (ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी)- समाप्त. 🌷
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
१. बुद्ध आणि वैदिक ऋषी
*********************

No comments:

Post a Comment