*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग दुसरा- कायमचा संसारत्याग
🌷 5. शांततेची वार्ता 🌷
News of Peace
*************************
1) गौतम राजगृहात असताना तेथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली.
2) हे पाच परिव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्दिक हे होत.
3) ते देखील गौतमाचे रुप पाहून थक्क झाले आणि त्याने परिव्रज्या का स्विकारली असावी असा त्यांना प्रश्न पडला.
4) राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जसे विचारले तसेच त्यांनी विचारले.
5) आपल्याला परिव्रज्या कोणत्या स्थितीत स्विकारावी लागले हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले, तेव्हा ते म्हणाले, "आम्ही त्याबद्दल ऐकले आहे. परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहित आहे काय?"
6) सिद्धार्थ म्हणाला, "नाही." नंतर त्यांनी त्याला सांगितले की, त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली.
7) स्त्री-पुरुषांंनी, मुला-मुलींनी निदर्शने केली आणि 'कोलीय हे आमचे भाऊ आहेत', 'भावाने भावा विरुद्ध लढणे हे चुकीचे आहे', 'सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा', अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणूका काढल्या.
8 ) या चळवळीचा असा परिणाम झाला की, शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेर विचार करावा लागला. या वेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते.
9) शाक्यांनी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले.
10 ) कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. शाक्यांच्या दूताशी वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी पाच कोलियांची निवड केली.
11) दोन्ही बाजूच्या दूतांची सभा झाली आणि एक कायमस्वरुपाचे लवाद मंडळ (permanent Council of Arbitration) नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाणीवाटपाबाबत प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूला बंधनकारक ठरवण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला.
12) कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यावर ते परिव्राजक म्हणाले, "आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही?"
13) सिद्धार्थ म्हणाला, "ही सुवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे. परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे."
14) त्या पाच परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, "आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही?" सिद्धार्थ म्हणाला, "लवकरच येईन. पण प्रथम मला इतर मार्गांची परीक्षा केली पाहिजे."
15) नंतर ते पाच परिव्राजक निघून गेले.
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
६. नव्या परिस्थितीतील समस्या
*********************
No comments:
Post a Comment