*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग दुसरा- कायमचा संसारत्याग
🌷 4. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (उत्तरार्ध) 🌷
Reply by Gautama (concluded)
*************************
1) "जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्गलोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही."
2) "आणि महाराज, तीन पुरुषार्थांचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय, हे जे आपण मला सांगितले,-- आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय असे आपण म्हणता, -- त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपले हे तीन पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाहीत."
3) "आणि आपण म्हणता 'वृद्धापकाळ येईपर्यत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते.' -- याविषयी बोलावयाचे म्हणजे या निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे. कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते आणि तारुण्य स्थिर व ठाम असू शकते."
4) "परंतु ज्याअर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की, ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्र्यात ठेवू शकते, त्याअर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे माहित नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहात बसेल?"
5) "वृद्धत्वरुपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरुपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्या वेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो त्या वेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल?"
6) "ज्यांचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण, वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल."
7) "आणि आपण म्हणता की 'तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत रहा.' अशा यज्ञांना माझा नमस्कार! दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळविण्याची माझी इच्छा नाही."
8 ) "भावी फळाच्या आशेने असहाय्य पशूला ठार करण्याने यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारेही असले तरी देखील दयाशील आणि सह्रदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल."
9) "आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म; जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतिनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करुन सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते, त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही."
10) "दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या, दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते, तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगात माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल."
11) "भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही. महाराज! पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगांतून कोसळणाऱ्या पावसाचा मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात."
12) स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, "तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे जे काही करावयाचे आहे ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर."
13) पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला.
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
५. शांततेची वार्ता
*********************
No comments:
Post a Comment