*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग दुसरा- कायमचा संसारत्याग
🌷 3. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध) (iv) 🌷
*************************
33) "सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा, या आणि इतर अनेक परस्परविरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही."
34) "सुख आणि दुःख यांचे स्वरुप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते, तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी मला सारख्याच वाटतात. राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो."
35) "राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्विकारणे होय; आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात. कारण राजा हा खुंटीसारखा आहे; -तो जगासाठी त्रास सहन करीत असतो."
36) "जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय आणि याउलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार."
37) "आणि संपूर्ण पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एका शहराचा उपयोग वसतिस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राजेपद म्हणजेच केवळ इतरांसाठी केलेले कष्ट नव्हेत काय?"
38) "आणि राजपद स्विकारल्यावर सुद्धा वस्राच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते, आणि केवळ भूक शमवणे इतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढीच राजाला गरज असते. या खेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरवण्यासाठी असतात."
39) "आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फलाची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेल; आणि जर माणसाला एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत का?"
40 ) "म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत फसणार नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की, सुखांना काही किंमत आहे काय?"
41) "मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे. किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे. किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करुन घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सुचना नाकारतो असे ही नाही."
42) "अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटवलेल्या गवताची चूड पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करील, असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठीमागे लागेल."
43) "डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील, स्वतंत्र असून बंधनात असलेल्यांचा हेवा करील, श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करील, शहाणा असून वेड्याचा हेवा करील, तोच - मी म्हणतो फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील."
44) "माझ्या सन्मित्रा, जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात."
45) "परंतु संपत्तीमान असूनही जो लोभीष्ट आहे, त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच; पण दुःख अनुभवावे लागते. त्याची मात्र कींव केली पाहिजे."
46) "आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य, आपला जीवनमार्ग आणि आपले कूळ यांना शोभेल असे आहे. आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य, माझा जीवनमार्ग आणि माझे कूळ यांना शोभेल असेच आहे."
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (उत्तरार्ध)
*********************
No comments:
Post a Comment