*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग दुसरा- कायमचा संसारत्याग
🌷 3. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध) (iii) 🌷
*************************
23) "हाड चघळीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखाचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"
24) "अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे, जो कपाळकरंटा सुखोपभोगांच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याला या जीवनसृष्टीत मृत्यूचे दु:ख भोगावे लागते."
25) "गाण्यावर लुब्ध होऊन हरिण स्वतःचा नाश ओढवून घेतात. तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. आमिषाला भुलून मासा लोखडांचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात."
26) "सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही सुख उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्रे आणि इतर सुखे म्हणजे वस्तूंचे केवळ सोबती (accessories of things) होत. - दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्व मानले पाहिजे."
27) "तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते; त्याच प्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते; आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी-वारा यांपासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते."
28) "याचप्रमाणे झोपेची गुंगी, थकवा घालवण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची स्वच्छता, आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते."
29) "म्हणून बाह्य वस्तू म्हणजेच मानवाच्या दुःख निवारण्याची साधने होत. ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्याचा उपयोग केला जातो; अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आंनदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील?"
30) "पित्तप्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे, शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना, तो त्या उपाययोजना म्हणजेच आंनदाचा उपभोग असे समजतो, तो सुखांना आनंद हे नाव देतो."
31) "ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते, त्या अर्थी मी आंनद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे."
32) "भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात; परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात."
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
३. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध) (iv)
*********************
No comments:
Post a Comment