पोस्ट नं 44

📚 पोस्ट नं 44 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग दुसरा- कायमचा संसारत्याग
🌷 3. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध) (ii) 🌷
*************************

11) "या जगात सुखासारखी (pleasures) दुसरी आपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे जर समजले आणि असत्याची, वाईटाची भिती वाटू लागली, तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरेल?"

12) "समुद्रांनी वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही. तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही."

13) "मंधात्रीला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली. त्याने सर्व खंड जिंकले व शुक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले. तरीही त्याची ऐहिक पदार्थांविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती."

14) "इन्र्द जेव्हा वृत्राच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुषाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठया ऋषींना वहावयास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता."

15) "इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषिमुनींना देखील ज्याने जिंकले त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील?"

16) "सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्याच्या जे पाठीस लागले आहेत, त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते."

17) "सुखप्राप्तीतील यश म्हणजेच सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो. उन्मत्तपणामुळे जे करु नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही. आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधःपतनात होतो"

18) "कष्ट करुन मिळवून ठेवलेली, तुम्हाला फसवून जिथून आली तेथे परत जाणारी - व काही काळापुरती उसणी घेतलेली ही सुखे, या सुखांत कोणता आत्मसंयमी मनुष्य - तो जर शहाणा असेल तर - रममाण होईल?"

19) "ज्यांचा शोध करुन ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

20) "जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

21) "ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहेत, अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

22) "ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतलेला आहे अशा आत्मसंयमी पुरुषाचाही नाश होतो. त्यांना आंनद मिळत नाही. - संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

🌷🌿🌸🌷🌸🌿🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
३. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध) (iii)
*********************

No comments:

Post a Comment