पोस्ट नं 33

📚 पोस्ट नं 33 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 18. गृहत्याग (ii) 🌷
(Leaving His Home)
***********************

16) अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करुन सिद्धार्थ परिव्रज्येची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला.

17) भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो विधी-समारंभ केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहिर केले.

18) परिव्रज्या घेण्याची व अकारण विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रज्येचा विधी-समारंभ आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला.

19) जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. कारण गौतमाला परिव्रज्या घ्यावयास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला.

20) त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला.

21) तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून बोलला: "बंधुंनो आणि भगिनींनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यामुळे काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे. परंतु तडजोडीच्या बाजुने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित् यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा." ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परत जाऊ लागला.

22) शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले.

23) सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली.

24) परिव्रज्या (संन्यास) ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षे होते.

25) लोक त्याची आठवण करुन त्याची प्रशंसा करत व हळहळ व्यक्त करून म्हणत, "हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणसाठी तो स्वकीयांशी लढला."

26) "तो असा युवक होता की जो स्वकीयांच्या बहुमतांपुढे झुकला नाहीच, पण स्वच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्रय, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि तो अशाप्रकारे जात आहे, की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही."

27) "हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होता. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात याला तुलना नाही. त्याला 'शाक्यमुनी' अथवा 'शाक्यसिंह' असेच म्हणावे लागेल."

28) शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्यासंबंधी तिने म्हटले होते, "धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला. धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला."

🌷🌿🌸🌷🌸🌿🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १९. राजपुत्र आणि त्याचा सेवक
*********************

No comments:

Post a Comment