पोस्ट नं 31

📚 पोस्ट नं 31 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 17. निरोप (ii) 🌷
(Parting Words)
***********************

14) "पण आई! सर्व शाक्यजन काय म्हणतील?" सिद्धार्थाने प्रश्न केला. "याला देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्रज्येचे कारण कोशलाधिपतीला समजेल, असे मी वाचेने व कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे."

15) "मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे. पण त्यात कुठले श्रेयस्कर? अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे?"

16) "पण ही घाई कशाला?" शुद्धोदन मध्येच म्हणाला, "शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे."

17 ) "कदाचित युद्ध होणार नाही. मग तू परिव्रज्या का स्थगित करु नये? कदाचित तुला शाक्यांत राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे."

18) सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, "मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे."

19) "मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेणेस संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रज्या घेण्यावर अवलंबून आहे."

20) "मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील."

21) "आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे."

22) गौतमी व शुद्धोदन स्तब्ध राहिले.

23 ) सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच शांतता भंग केली. ती म्हणाली, "कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे."

24) सिद्धार्थाने विचारले, "यशोधरा, मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते?"

25) त्याला वाटले की ती मूर्च्छित होऊन पडेल. पण तसे काही झाले नाही.

26) आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, "मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करु शकले असते? कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारीण झाले नसते."

27) "आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला संमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे."

28) पुढे ती म्हणाली, "असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करु नका. माझ्या शरीरात प्राण असे पर्यंत मी त्यांची देखभाल करीन."

29) "ज्याअर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्याअर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी व सुखकारक ठरेल, हीच एक केवळ माझी इच्छा आहे."

30) सिद्धार्थ गौतम खूपच प्रभावित झाला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्री आहे, याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला, याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्यदृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला.

🌷🌿🌸🌷🌸🌿🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १८. गृहत्याग
*********************

No comments:

Post a Comment