पोस्ट नं 297

📚 पोस्ट नं 297 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
🌷2. अंतिम धर्म-दीक्षा 🌷
The Last Convert
*************************

1) सुभद्र नावाचा परिव्राजक कुशिनारा येथे राहत होता. सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोकवार्ता पडली. "असे म्हणतात की, आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचे परिनिर्वाण होणार आहे." तेव्हा सुभद्र परिव्राजकाच्या मनात आले:

2) "काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिव्राजकांना असे म्हणताना मी ऐकले आहे की, ह्या जगात अर्हत, सम्यक, संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत. आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह निर्माण झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की, ते मला असा उपदेश देतील की, जेणेकरुन माझ्या संदेहाचे निराकरण होईल."

3) सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थविर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला "स्थविर आनंद, मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय?"

4) त्याचे शब्द ऐकून स्थविर आनंद त्याला म्हणाला, "पुरे, पुरे सुभद्र! तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये. ते पार थकून गेले आहेत."

5) सुभद्र परिव्राजकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा विनंती केली. स्थविर आनंदाने त्याला तीनही वेळा तेच उत्तर दिले.

6) सुभद्र परिव्राजक आणि स्थविर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारुन म्हटले, "आनंदा, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागावयाचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल. मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे. आणि जे उत्तरादाखल मी सांगेन ते तत्काळ त्याला समजेल."

7) तेव्हा स्थविर आनंद परिव्राजकाला म्हणाला, "सुभद्रा, आत प्रवेश कर. तथागतांची तुला परवानगी आहे."

8). तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करुन कुशल-वर्तमानाचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूला जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला,

9) "श्रमण गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचार्य आहेत, जे पंथसंस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानीत आली आहे, असे श्रमण आणि ब्राम्हण - पूर्णकाश्यप, मख्खली गोशाल, अजित केशकंम्बल, पकुध कच्चायन, वेलट्टीपुत्र संजय तसेच नाथपुत्र निगण्ठ ह्या सर्वांना ते म्हणतात तसे आपल्या आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही? की काहींना झाले आणि काहींना झाले नाही?"

10) "सुभद्र! काहींना ज्ञान प्राप्त झाले की, काहींना प्राप्त झाले नाही या असल्या गोष्टीत तू पडू नकोस. मी तुला धम्मोपदेश करतो तो नीट ध्यान देऊन श्रवण कर. लक्ष दे. मी सांगतो."

11) "तथागत! फार चांगले." असे बोलून सुभद्र परिव्राजकाने तथागत बुद्धांकडे एकाग्रतेने ध्यान दिले. त्यावर तथागत बोलले;

12) "सुभद्र! ज्या धम्ममतामध्ये अरिय- अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्मात अरिय अष्टांगिक मार्ग आहे, त्यात श्रमणही असतो."

13) "सुभद्र! माझ्या धम्मात अरिय अष्टांगिक मार्ग आहे. म्हणून या धम्मात चार प्रकारचे (चार स्तरांवरील) श्रमण आहेत. दुसऱ्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे; पण सुभद्र जर ह्या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर ह्या जगतात अर्हतांचा अभाव कधीच आढळणार नाही."

14) "मी एकोणतीस वर्षांचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो."

15) "सुभद्र! सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्याला आता पन्नासहून अधिक वर्षे होऊन गेली असतील."

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷💐🌿💐🌷

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*भाग तिसरा- महापरिनिर्वाण*
*२. अंतिम धर्म-दीक्षा (ii)*
*************************

No comments:

Post a Comment