पोस्ट नं 289

📚 पोस्ट नं 289 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग पहिला- निकटवर्तीयांच्या भेटी
Part I- The Meeting of those Near and Dear
*************************
🌷1. धम्मप्रचाराची केंद्रे 🌷
The Centres of His Preachings
*************************

1) धम्मदुतांच्या नियुक्तीनंतर तथागत बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणी बसून राहिले नाही. आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरु ठेवले.

2) आपले धम्मप्रचाराचे कार्य करण्यासाठी काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी लक्ष केंद्रित केले होते असे वाटते.



3) अशा केंद्रांपैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती.

4) त्यांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा भेट दिली होती.

5) आणखी इतर स्थळीही धम्मप्रचाराची छोटी केंद्रे होती.

6) जसे कपिलवस्तू येथे ते सहा वेळा गेले होते व वैशाली येथेही सहा वेळा गेले. कम्मासद्धम इथे चार वेळा.
***🌷🌷🌷🌷🌷***

*🌷 2. त्यांच्या भेटीची स्थाने🌷*
-------------------------------------------

1) आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहानमोठ्या केंद्राशिवाय इतरत्रही त्यांनी भेटी दिल्या.

2) ते उक्कठा, नादिका, साला, अस्सपुर, घोषिताराम, नालंदा, आप्पण, एतुमा येथे गेले.



3) ते ओपसाद, इच्छा-नौकल, चण्डाल-कप्प, कुशिनारा येथे गेले.

4) ते देवदह, पावा, अम्बसन्दा, सेतव्या अनुपिया आणि उजुन्मा येथे गेले.

5) त्यांनी भेटी दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजते की, शाक्यदेश, कुरुदेश व अंगदेश या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता.

6) सामान्यतः असे म्हणावयास हरकत नाही की, त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती.

7) या स्थळांची संख्या जरा कमी वाटते; पण यामध्ये अंतर किती आहे? लुंबिनीपासून राजगृह अडीचशे मैलांपेक्षा (250 miles) कमी लांब नाही. यावरुन अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल.

8). ही सर्व यात्रा तथागत बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचासुद्धा उपयोग केला नाही.

9) या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा सुरुवातीला उपलब्ध नव्हती. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांतीस्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूंची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. बहुतेक वेळा तथागत बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत.
10) त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांच्या संदेह व अडचणींचे निवारण करीत, जे जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करुन उत्तर देत व जे अजाण बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवित; तथागत बुद्धांची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राही.

11) तथागत बुद्ध जाणून होते की, जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचे नव्हते.

12) त्यांनी आपल्या भिक्खूंना सुचना दिली होती की, श्रोतृवर्ग तीन प्रकारचा असू शकतो.

13) निर्बुद्ध - ज्या मुर्खाला काहीही दिसू शकत नाही. तो पुन्हा पुन्हा भिक्खुंकडे जातो. त्यांचे भाषण आदि-मध्य-अंत असे संपूर्ण ऐकतो. पण त्याला काहीच उमजत नाही. त्याला बुद्धी मुळीच नसते.

14) यापेक्षा चांगला, म्हणजे तो मन एकाग्र करु शकत नाही असा माणूस. तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो. त्यांचे भाषण आदि-मध्य-अंत असे संपूर्ण ऐकतो. तसे करताना त्याला सर्व उमजतेही. पण तेथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही. त्याचे मन कोरे असते.

15) ह्यावरुन ही श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस. तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो. त्यांचे भाषण आदि-मध्य-अंत असे संपूर्ण ऐकतो. तसे करताना त्याला सर्व उमजते. सर्व काही स्मरणात राहते. व त्यानुसार तो वागतो.

16) असे असूनही तथागत बुद्ध धम्मप्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत.

17) भिक्खूंप्रमाणे त्यांच्यापाशी तीनपेक्षा जास्त चीवरे कधीही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्नग्रहण करीत. आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवित.

18) *कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नतेने.*

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*३. माता-पुत्राची आणि पती-पत्नीची अंतिम भेट*
*************************

No comments:

Post a Comment