

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग दुसरा- बुद्धांचे विरोधक व शत्रू
Part II- His Enemies
*************************


Charge of Being a Parasite!
*************************
1) तथागत बुद्धांवर परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करुन स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागतांचे त्यावर खालीलप्रमाणे उत्तर असे:
2) एकदा तथागत बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाला नामक ब्राम्हणाच्या गावात राहात असत. त्यावेळी कृषिवल भारद्वाजाचे पाचशे नांगर शेतीसाठी जोडले जात होते.
3) पहाटे लवकर चीवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राम्हण काम करीत होता, त्या ठिकाणी तथागत गेले. त्या वेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते, तथागत एका बाजूला उभे राहिले.
4) ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राम्हण म्हणाला, "श्रमण, मी नांगरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्हीसुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे."
5) "ब्राम्हणा, मी ही खाण्यापुर्वी नांगरतो आणि बी पेरतो."
6) "श्रमण गौतमाचा नांगर, जू, फाळ, पराणी किंवा बैलजोडी कधी मी पाहिली नाही. तरीही आपण म्हणता की, मी खाण्यापुर्वी नांगरतो आणि बी पेरतो."
7) "तुम्ही कृषीवल असल्याचा दावा करता. पण तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचे आहे."
8). "श्रद्धा हे माझे बीज, तपस्या ही वर्षा, प्रज्ञा हे जू आणि नांगर, पापभीरुता हा दंड. विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर, फाळ आणि पराणी." तथागतांनी उत्तर दिले.
9) "वचन आणि कर्म ह्यामध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून, निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्ट बैल आहे, जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने, जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी, मला तो घेऊन जातो."
10) हे ऐकल्यावर ब्राम्हणाने काश्याच्या पात्रात खीर घालून ती तथागत बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला, "श्रमण गौतम, हिचा स्वीकार करा, खरोखरच आपणच कृषीवल आहात. आपण अमृताचे पीक काढता."
11) तथागत त्यावर बोलले, "पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाहीत. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकली पाहिजे. एखाद्या पवित्र, शांत, प्रवीण, सत्प्रवृत्त श्रमण ब्राम्हणास ते दे. त्याने पुण्यलाभ होईल."
12) तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राम्हण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला, "श्रमण गौतम, अद्भुत! खरोखरच हे अद्भुत आहे. जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखाद्या अधःपतित पुरुषाला उपदेश करतो किंवा एखादी गुह्य गोष्ट सांगतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो, तसेच तथागतांनी नाना प्रकारांनी आपला धर्म स्पष्ट करुन सांगितला."
13) "बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रवज्या आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा." अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रव्रज्या व उपसंपदा ग्रहण केली.
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*३. सुखी संसार उध्वस्त केल्याचा आरोप*
*************************
No comments:
Post a Comment