

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग पहिला- बुद्ध आणि त्यांचे समर्थक
Part I- His Benefactors
*************************


Gift from Jeevaka
*************************
1) जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा वैद्यकतज्ञ जीवक दिवसातून दोन वेळा त्यांच्याकडे जात असे.
2) बिंबीसार राजाने दान केलेले वेळूवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले.
3) राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्याच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते.
4) तिथे एक सर्वांगपरिपूर्ण विहार बांधावे आणि आम्रवनासहीत तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले.
5) ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांजवळ गेला आणि आपली इच्छा पूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली.
6) तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली.
-------------------------------
*


Gift from Ambrapali
-------------------------------
1) तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्यांनी आनंदास हाक मारली आणि म्हटले. "चल आनंदा, आपण वैशालीला जाऊ या."
2) "बर तर." संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला.
3) नंतर महाभिक्खूसंघासहित तथागत वैशालीकडे निघाले. तेथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास गेले.
4) तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले. तिने पुष्कळ शासकीय वाहने मागवून, त्यापैकी एकात स्वतः आरुढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली. जिथपर्यत रथ जाऊ शकला तिथपर्यत ती रथातून गेली. मग खाली उतरुन तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली. ती तशी बसल्यानंतर तथागतांनी तिला धर्मोपदेश केला.
5) नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली, "तथागत भिक्खूसंघासहित उद्या माझ्याकडे भोजनास येतील काय?"
6) तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली. आपल्या आमंत्रणाचा स्वीकार त्यांनी केला हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरुन उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले. नंतर प्रदक्षिणा घालून ती तेथून निघाली.
7) वैशालीच्या लिच्छवींना समजले की, तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावयाचे होते. म्हणून त्यांनीही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करुन प्रत्येकात एक एक जण आरुढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले.
8). आम्रपालीची आणि त्यांची परस्परविरुद्ध दिशेने येताना गाठ पडली.
9) त्या तरुण लिच्छवीच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक, आसाला आस आणि जूला जू असे विरुद्ध दिशेला गेले तेव्हा ते तिला म्हणाले, "आम्रपाली, आमच्या रथांना अशी मागे टाकत तू का बर निघाली आहेस?"
10) "महाराज, आताच मी तथागतांना भिक्खूसंघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे." आम्रपाली म्हणाली.
11) "हे सौभाग्य आम्हास प्रदान कर. आम्ही तुला एक लक्ष देऊ करतो."
12) "महाराज! वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हे मी करणार नाही."
13) लिच्छवी हातवारे करीत बोलले, "ह्या आम्रपालीने आम्हास हरविले," आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले.
14) आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळवावा ह्या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले.
15) लिच्छवी दुरुन येताना दिसताच भिक्खूंना म्हणाले, "आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिच्छवींकडे पहावे. ह्या लिच्छवींच्या समुदायाकडे पहावे. आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे हे परलोकांतील जणू देवच आहेत."
16) रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले.
17) नंतर तथागतांना उद्देशून ते बोलले, "तथागतांनी भिक्खूसंघासह उद्याच्या भोजनाचे आमचे निमंत्रण स्वीकारुन आमच्यावर कृपा करावी."
18) "हे लिच्छवी जनहो, उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे," ते म्हणाले.
19) आम्रपालीने आपल्याला हरविल्याची लिच्छवीची आता खात्री पटली. तथागतांचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरुन उठले आणि तथागतांना अभिवादन करुन प्रदक्षिणा घालून ते निघून गेले.
20) रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रासादात साखरभातादी मिष्टान्ने तयार करुन ती तथागतांना म्हणाली, "महाराज वेळ झाली भोजन तयार आहे."
21) पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खूसंघासह आम्रपालीच्या प्रासादात ते गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले. मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखरभात व मिष्टान्ने वाढली आणि पोट भरेतो पर्यंत त्यांना स्वतः आग्रह केला."
22) भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली:
23) "तथागत! आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे." तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर ते तिथून निघाले.
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
खंड सहावा - तथागत आणि त्यांचे समर्थक
*५. विशाखेची दानशूरता*
*************************
No comments:
Post a Comment