पोस्ट नं 26

📚 पोस्ट नं 26 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 15. देशत्यागाची तयारी (i) 🌷
(Offer of Exile)
*********************

1) दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलाविली.

2) संघाची सभा भरल्यानंतर "कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 50 वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने शाक्य सैन्यात सहभागी व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी," असा सेनापतीने ठराव मांडला.

3) संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्ध करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते आणि ज्यांनी विरुध्द बाजूने मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक सभेला उपस्थित होते.

4) ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा निर्णय स्विकारण्यास काहीही अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविकच परिणाम होता.

5) परंतु ज्या अल्पसंख्यांंकांनी याविरुद्ध मत व्यक्त केले होते, त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता- "बहुसंख्यांच्या निर्णयापुढे नमावे कि नमू नये?"

6) अल्पमतवाल्यांनी निर्णय घेतला होता की, बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही. आणि याच कारणामुळे त्यांनी सभेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुर्दैवाने त्यांच्यापैकी कोणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव झालेली असावी.

7) जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की, आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करुन बसले आहेत, तेव्हा तो उभा राहिला व संघास उद्देशून म्हणाला, "मित्रहो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे, की सैन्यभरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही."

8 ) सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, "संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केला तर तुला लोकनिंदेला (public shame) तोंड द्यावे लागेल."

9) सिद्धार्थाने उत्तर दिले, "होय. मी माझ्या तन-मन-धनाने शाक्यांचे हितसंवर्धन करण्यास वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे, असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा?"

10) कोलियांंबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरुन शाक्य हे कोसलाधिपतीच्या हातचे (vassals of King of Kosala) कसे खेळणे बनले आहेत, याची आठवण करुन देऊन पुढे सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, "हे समजणे कठीण नाही की, कोशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करुन देईल."

11) सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, "तुझे हे भाषण-कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की, कोशलराजाच्या अनुज्ञेवाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फर्मावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही."

🌷🌿🌸🌷🌸🌿🌷
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १५. देशत्यागाची तयारी (ii)
*********************

No comments:

Post a Comment