*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 14. संघाशी संघर्ष (iii) 🌷
(Conflict with the Sangh)
*********************
15) सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले. परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, "माझी खात्री आहे की, जोपर्यंत कोलियांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत त्यांचा हा उपद्रव थांबणार नाही."
16) यामुळे मूळ ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले.
17) सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा (युद्ध व सैन्यभरतीचा) प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, "हा प्रस्ताव मान्य करु नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही."
18) सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की, "क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करु शकत नाही. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्ख्या भावाशी देखील लढले पाहिजे."
19) "यज्ञयाग करणे हा ब्राम्हणाचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्याचा धर्म आहे, तर सेवा व चाकरी करणे हा शुद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म(duty) पालन करण्यात पुण्य(merit) आहे. हीच आपल्या शास्रांची आज्ञा आहे."
20) सिद्धार्थाने उत्तर दिले, "धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, शत्रुत्वावर प्रेमानेच मात करता येते, हे समजणे म्हणजे धर्म."
21) अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, "या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे, की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे, हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करुन घेऊया."
22) त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १५. देशत्यागाची तयारी
*********************
No comments:
Post a Comment