पोस्ट नं 24

📚 पोस्ट नं 24 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 14. संघाशी संघर्ष (ii) 🌷
(Conflict with the Sangh)
*********************

10) संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, "आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापुर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केलेली आहेत. पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे. आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्याविरुध्द युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरूध्द संघाने युद्ध पुकारावे असा ठराव मी मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे."

11) सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, "या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. आणि जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो."

12) सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, "संघाने कोलियांच्या विरुध्द युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये. दोष कोणाचा आहे याची खात्री करुन घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहीजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुध्दा निर्दोष नाही हे सिद्ध होते"

13) सेनापतीने उत्तर दिले, "होय, आपल्या लोकांनी आक्रमण केले. तथापि, आपण हे विसरता कामा नये की, प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती"

14) सिद्धार्थ गौतम म्हणाला, "यावरुन स्पष्ट होते की, आपण दोषांपासून पुर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की, आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडण्यास सांगावे. आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा. आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे."

🌿🌸🌷🌸🌿
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १४. संघाशी संघर्ष (iii)
*********************

No comments:

Post a Comment