

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- बुद्धांची प्रवचने
Part IV- His Sermons
*************************
VI (सहा)- बुद्धांची सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने
SECTION SIX-- SERMONS ON SOCIO-POLITICAL QUESTIONS


Do Not Depend on the Favour of Princes
***********************
1) एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनात कलंदक-निवासात राहात होते.
2) त्या वेळी भगवंतांविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता.
3) सकाळ-संध्याकाळ पाचशे गाड्यांतून देवदत्ताच्या शिष्यगणांना तो अन्नपात्रे पाठवित होता.
4) तेव्हा काही भिक्खू भगवंतासमोर आले आणि साभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी तथागतांना देवदत्तासंबंधाची वार्ता सांगितली.
5) तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, "राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ-संध्याकाळ पाचशे गाड्यांत अन्नपात्रे भरून अन्न पुरवीत आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल."
6) "भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले तरी तो कुत्रा अधिकच पिसाळतो. त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोशीत आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार; त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत."
7) "सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गांतील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत."
8). "म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकविले पाहिजे की, आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू आणि त्यांचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवू देणार नाही, त्याच्या लालसेने आम्हांला राजाचे दास बनवू देणार नाही."












If the King is Righteous, his Subjects will be Righteous
1) एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, "भिक्खूहो,"
2) "जोपर्यंत राजा हा नीतीमान नाही, तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी नीतीमान होऊ शकत नाहीत. प्रधान आणि कर्मचारी दुराचारी झाले की, ब्राम्हण आणि गृहस्थही दुराचारी होतात. ब्राम्हण आणि गृहस्थ हे दुराचारी व दुष्ट असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही दुराचारी होतात."
3) "परंतु जेंव्हा राजे सदाचारी व नीतीमान असतात तेव्हा हे भिक्खूंनो, त्याचे प्रधान आणि कर्मचारीही सदाचारी होतात. जेंव्हा राजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी नीतीमान असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही सदाचारी होतात. जेव्हा ब्राम्हण आणि गृहस्थ सदाचारी असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही सदाचारी होतात."
4) "गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्यामागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसांमध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाममार्गाने जाऊ लागला तर इतरेजनही त्याच मार्गाचा अवलंब करतात."
5) "त्याचप्रमाणे राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणेच जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते."






**********************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*३. राजकीय आणि लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते*
*************************
No comments:
Post a Comment