पोस्ट नं 229

📚 पोस्ट नं 229 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- बुद्धांची प्रवचने
Part IV- His Sermons
*************************
III (तीन)- बुद्धांची सदाचरणावरील प्रवचने
SECTION THREE-- Sermons on Righteousness
🌷3. सदाचार आणि जगाचे दावे 🌷
Righteousness and the Claims of the World
***********************

1) एकदा भगवान खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळू-वनात राहात होते. त्या वेळी स्थविर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होते.

2) वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला. औपचारिक आभिवादनादी प्रकार झाल्यावर सारीपुत्ताने त्यांना तथागतांचा कुशल समाचार विचारला. भिक्खूने भगवंत व भिक्खूसंघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणेच सारीपुत्ताने विचारल्यावरुन राजगृह नगरात तंडूलपाल-दारापाशी राहणाऱ्या धनंजानी ब्राम्हणाचा कुशल समाचार सांगितला.

3) "सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले, 'ब्राम्हण धनंजानी अप्रमादपूर्वक वागतो का?'"

4) भिक्खूने उत्तर दिले, "धनंजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राम्हण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राम्हण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातली नाही व स्वतःही सुशील नाही."

5) यावर सारीपुत्त बोलला, "धनंजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे; फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल, त्या वेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन."

6) दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला. तेथे त्याने वेळूवनात वस्ती केली.

7) सकाळी वस्त्र परिधान करुन, भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला. त्या वेळी ब्राम्हण धनंजानी हा त्याच्या गाईचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता.

8). भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजानीला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राम्हण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, "भोजनापूर्वी आपण दुग्धपान करू या."

9) सारीपुत्ताने उत्तर दिले, "नको ब्राम्हणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तेथे ये."

10) धनंजानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्ताला भेटावयास गेला. सारीपुत्ताला अभिवादन करुन तो त्यांच्या बाजूला बसला.

11) सारीपुत्ताने त्याला विचारले, "सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना?"

12) तो ब्राम्हण म्हणाला, "ती कशी कायम राहणार? कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंब, दास, कामकरी यांचे पालनपोषण करावयाचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्तेष्ट आणि पाहुणे-अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात. राजाला कर-भार चुकवायचा असतो आणि उपरान्त मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करायची असते."

13) सारीपुत्ताने विचारले, "धनंजानी, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्यासंबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की, मी माझ्या आईबापासाठी हे सर्व केले! त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका?"

14) "नाही." धनंजानी म्हणाला, "अशा काहीही सबबी दिल्या तरी दैवीचा कारावास चुकणार नाही."

15) सारीपुत्त: "तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्याच्यासंबंधी असे समर्थन करू लागले की, त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले, तर त्याचा काही उपयोग होईल काय?"

16) धनंजानी: "नाही."

17) सारीपुत्त: "त्याचे दास म्हणू लागले की, हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल का?"

18) धनंजानी: "नाही. तीळमात्र उपयोग होणार नाही."

19) सारीपुत्त: "किंवा त्याचे मित्र आणि ओळखीपाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का?"

20) धनंजानी: "नाही! तिळमात्रही उपयोग होणार नाही."

21) "किंवा त्याचे आप्तेष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का?"

22) "नाही! तीळमात्रही नाही."

23) "किंवा त्याचे मृत नातेवाईक जर देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय?"

24) "नाही! तीळमात्रही चालणार नाही."

25) "तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हांला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का?"

26) "नाही!"

27) सारीपुत्त: "जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो, आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडीत नाही, यांपैकी धनंजानी, कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो?"

28) धनंजानीने उत्तर दिले, "दुसऱ्या प्रकारचा. कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे."

29) "धनंजानी, आपल्या आईबापांचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्ये करण्याची आवश्यकता नाही. आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का?" सारीपुत्ताने विचारले.

30) धनंजानी: "सारीपुत्ता ते मार्ग मोकळे आहेत."

31) यानंतर सारीपुत्ताच्या ह्या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजानी उठला आणि आपल्या गृही परत गेला.

**********************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल?
*************************

No comments:

Post a Comment