पोस्ट नं 216

📚 पोस्ट नं 216 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग तिसरा- बौद्ध जीवनमार्ग
Part III- Buddhist Way of Life
*************************
🌷5. मनुष्य, मन आणि मनोमल 🌷
On Man, Mind and Impurities
*************************

1) *मन घडविते तसा मनुष्य होतो.*
Man is what his mind makes him.

2) *जे सत् , कुशल (good) आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे, उत्तमाची इच्छा असणे, यासाठी मनाचे प्रशिक्षण हे नीतीमार्गातील पहिले पाऊल होय.*

3) *बौद्ध जीवनमार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे.*

4) मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मन:प्रधान आहेत.

5) मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलत किंवा वागत असेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते.

6) मनुष्य जर चांगल्या चित्ताने बोलत किंवा वागत असेल तर कधीही न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते.

7) मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण तयार करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान माणूस मनाला एकाग्र व सरळ करतो.

8). पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते, त्याप्रमाणे माराच्या, विकारांच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकूळ असते.

9) ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते.

10) तू आपल्या स्वतःस एक द्वीप (बेट) बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू सुंदर अशा जगात (heavenly world) पोहोचशील.

11) ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रूप्यातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा, वेळोवेळी नाहीसा करतो.

12) लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म (अकुशल कर्म) त्याला दुर्गतीकडे नेत असते.

13) सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा.

14) जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाचे जीवन सुकर, सोपे आहे.

15) परंतु जो विनम्र आहे, पवित्र-अपवित्र याचा विचार करतो. अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे अशा बुद्धिमान मनुष्याला जीवन कठीण आहे.

16) जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परस्रीकडे जातो (goes to another man's wife),

17) आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो. तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो.

18) माणसा, हे लक्षात ठेव. संयमहीनांची स्थिती चांगली नव्हे (unrestrained are in a bad state); लोभ (greediness)आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे.

19) जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते, जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्नपाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही.

20) परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते.

21) कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा वादळी प्रवाह नाही.

22) परदोष हे सहज दिसतात. परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपेशी फासा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवीत असतो.

23) जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहातो.

24) अकुशल कर्मापासून (पापापासून) दूर राहा. स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, ही भगवान बुद्धांची शिकवण आहे.

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*आपण आणि आत्मविजय*
*************************

No comments:

Post a Comment