पोस्ट नं 212

📚 पोस्ट नं 212 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात
Part II- How Similarities in Terminology Conceal Fundamental Differences
*************************
🌷पाच- गैरसमजुतींचे कारण 🌷
Section V- Causes of this Misunderstanding
**********************

1) बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवृंद भिक्खूंचा असे.

2) कोणत्याही एका विषयावर बुद्धांचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले.

3) लेखनकला अद्यापि विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करुन ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करुन ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला. त्यांना *भणक* म्हणत.

4) *बौद्ध तत्त्वज्ञान व सिद्धांतविषयक साहित्य समुद्रासारखे विशाल आहे.* ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते.

5) पुष्कळ वेळा बुद्धांनी जो उपदेश केला त्याचे वृत्तांत-कथन यथातथ्य झाले नाही.

6) तथागतांच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैर कथन (misreporting) झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या.

7) उदाहरण म्हणून अशा पाच स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख *'अलग ददुपम'* सुत्तात आहे. दुसरा *'महा-कम्म-विभंग'* सुत्तात, तिसरा *'कण्णकट्ठल'* सुत्तात, चौथा *'महा-तण्हा-संख्य'* सुत्तात, आणि पाचवा *'जीवक'* सुत्तात.

8). *अशा प्रकारे तथागतांच्या उपदेशाचे गैर निवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे.* कारण भिक्खू भगवान बुद्धांपाशी जाऊन, अशा प्रसंगी आम्ही काय करावे, असे विचारताना आढळतात.

9) *'कर्म आणि पुनर्जन्म'* ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे.

10) 'कर्म आणि पुनर्जन्म' ह्या विषयाच्या सिद्धान्तांना ब्राम्हणी धर्मातही स्थान आहे. ह्याचा परिणाम असा झाला की, *ब्राम्हणी सिद्धान्त सहजगत्या बौद्ध धम्मात घुसडता आले.*

11) यासाठी बौद्ध साहित्यात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे.

12) यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे.

13) भगवान बुद्धांच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की, *बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नव्हे.* (if not rational, if not logical) म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही.

14) दुसरी गोष्ट अशी की, *जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेत भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत.* म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धांच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. (Anything attributed to the Buddha which did not relate to man's welfare cannot be accepted to be the word of the Buddha.)

15) तिसरीही एक कसोटी आहे. ती ही की, *भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत, आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची दोन प्रकारांत वर्गवारी केली होती.* जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्यासंबंधी त्यांनी आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. परंतु ते तात्पुरते आहेत (म्हणजे बदलूही शकतात.)

16) ज्या तीन प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धांचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

☘☘☘☘☘☘☘☘☘☘
चवथा खंड, भाग दुसरा समाप्त
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*बौद्ध जीवनमार्ग*
*************************

No comments:

Post a Comment