

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

********************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात
Part II- How Similarities in Terminology Conceal Fundamental Differences
दोन- कर्म
Section II- Karma
*************************


Did the Buddha believe in Past Karma having effect on Future Life?
************************
1) कर्मसिद्धान्त (The Law of Karma) बुद्धांनी सांगितला व स्पष्ट केला होता. 'कराल तसे भराल' असे सांगणारे तथागत पहिलेच होते. (Reap as you sow)
2) ते कर्मसिद्धान्तावर इतका भर देत होते की, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धान्ताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था (moral order) अशक्य आहे.
3) भगवान बुद्धांचा कर्मसिद्धान्त हा 'कर्म' आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता.
4) तथापि, विस्तारित स्वरुपाचा असाही दुसरा एक कर्मसिद्धान्त आहे आणि या कर्मसिद्धान्ताप्रमाणे गतजन्मींच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो.
5) या दुसऱ्या कर्मसिद्धांतानुसार, माणूस गरीब कुळात जन्मास आला तर त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्मला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म.
6) जन्मतःच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म.
7) हा अत्यंत दुष्ट सिद्धान्त आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला, प्रयत्नांना काहीच स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल.
8). हा विस्तारलेला कर्मसिद्धान्त बौद्धप्रणीतच आहे असे सांगून नेहमी भगवान बुद्धांशी याचा संबंध जोडण्यात येतो.
9) परंतु बुद्ध खरोखरच हा सिद्धान्त मानीत होते काय?
10) ह्या विस्तारीत सिद्धान्ताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दांत सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दांत सांगणे योग्य होईल.
11) गत कर्म हे संक्रमित होते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे.
12) शब्दाच्या ह्या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धान्ताची कसोटी लावता येते. त्याचप्रमाणे ह्या शब्दपरिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही.
13) जे दोन प्रश्न एरव्ही माणसाला या सिद्धान्ताविषयी विचारणे शक्य झाले नसते, ते तोच सिद्धान्त निराळ्या भाषेत मांडल्यामुळे, शक्य झाले आहे. हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धान्त स्पष्ट होत नाही.
14) पहिला प्रश्न हा की, गत कर्माचा वारसा कसा लाभतो? त्याची प्रकिया कशी असते?
15) दुसरा प्रश्न असा की, वांशिकतेच्या दृष्टीने गत कर्माचे रूप कसे असते? ते वंशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते(inherent), की नंतर स्वतः संपादलेले (acquired) असते?
16) आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते?
17) विज्ञान सांगते, जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील अंड्यांत प्रवेश होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्यजंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्राणूत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ.
18) प्रत्येक मनुष्यप्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणांच्या युतीने होत असतो.
19) ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष(Yakkha) बुद्धांकडे आला होता, त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळेच होते, असे बुद्धांनी सांगितले.
20) त्या वेळी तथागत बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते.
21) यक्ष त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, "भगवान म्हणतात, पार्थिव आकार (रूप) म्हणजे जीव नव्हे; मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थि, हे जठर कोठून मिळतात! आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो?"
22) याला तथागतांनी उत्तर दिले, "प्रथम कलल होतो. नंतर अर्बुद. त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घनांत पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न, पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते.
23) हिंदू सिद्धान्त मात्र वेगळा आहे.
24) तो सिद्धान्त म्हणतो की, शरीर वंशानुगत मातापित्यांपासून प्राप्त होते. परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे अर्थात कोठून? हे काही हा सिद्धान्त सांगू शकत नाही.
25) आता गतकर्माचे स्वरूप कसे असते? या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे. ती म्हणजे, कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजावयाचा की स्वतःच संपादलेला गुण समजावयाचा?
26) या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धान्ताची त्याला कसोटी लावता येत नाही.
27) परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धान्त हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे, हे ठरविण्यास शास्त्र/विज्ञान कसे सहाय्य करू शकेल?
28) विज्ञानानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात.
29) हिंदू कर्मसिद्धान्ताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धान्ताप्रमाणे गत कर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर, स्वतः आपण आपल्यासाठी, आणलेला वारसा आहे.
30) त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणते.
31) अशा प्रकारचा सिद्धान्त बुद्धीस पटणारा ठरत नाही.
32) वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धीविसंगत सिद्धान्तावर विश्वास ठेवीत नाही. (**या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो काय? त्या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे.)
33) "जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही."
34) राजा मिलिंद म्हणाला, "नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर."
35) "राजा, असे समज, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय?"
36) "होय."
37) "परंतु दुसऱ्या माणसाने जे आंबे जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत, मग तो शिक्षापात्र का?"
38) "कारण, त्याने जे आंबे चोरले ते त्या लावलेल्या आंब्याचेच परिणामस्वरूप होते."
39) "त्याप्रमाणेच हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही."
40) "वा! छान नागसेना!"
41) राजा पुढे म्हणाला, "जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते?"
42) "ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडीत नाही, त्याप्रमाणे गत कर्मही त्याच्याबरोबर जाईल."
43) "पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का?"
44) "नाही."
45) "एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर."
46) "वृक्षाला जी फळे अद्यापि यावयाची आहेत ती, हे राजा, दाखविता येतील काय?"
47) "ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत, असे कोणाला म्हणता येईल काय?"
48) "निःसशय नाही."
49) "त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही, तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाही."
50) "वा, छान नागसेना."
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*कर्म*
३. गतकर्मांचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानत होते काय? (पुढे चालू)
No comments:
Post a Comment