

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात
Part II- How Similarities in Terminology Conceal Fundamental Differences
एक- पुनर्जन्म
Section I- Rebirth
*************************


Rebirth of Whom?
************************
1) सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा?
2) एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का?
3) या सिद्धांतावर बुद्धांचा विश्वास होता काय? असणे असंभाव्य दिसते.
4) मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन, त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे.
5) जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न, भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही.
6) भिक्खूणी खेमा हिने हा मुद्दा पसेनदी राजाला चांगलाच स्पष्ट करून सांगितला आहे.
7) एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथपिंडीकाच्या जेतवनारामात राहात होते.
8). त्यावेळी कोशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत ह्या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहात होती.
9) कोसल राजा पसेनदी साकेतहून श्रावस्ती येथे जात असताना एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला.
10) पसेनदीने एका माणसाला बोलावून सांगितले, "हे बघ. सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राम्हणाला घेऊन ये."
11) "ठीक आहे," असे बोलून तो तोरणवत्थूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राम्हण शोधू लागला; परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही.
12) शेवटी तोरणवत्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खूणी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कोसलराज पसेनदिकडे गेला आणि म्हणाला,
13) "महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राम्हण येथे कोणी दिसत नाही. परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्या आहे. तिच्यासंबंधी अशी वार्ता प्रसृत आहे की, ती विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रूत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्नमतीची अशी अर्हत् स्त्री आहे. (accomplished, shrewd, widely learned, brilliant talker, of goodly ready wit). महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल."
14) हे ऐकल्यावर कोसलराज पसेनदी भिक्खुणी खेमाला भेटण्यास गेला. तिकडे गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला,
15) या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? "मृत्यूत्तर तथागताचे अस्तित्व राहते काय?"
16) "महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही."
17) "तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे?"
18) "महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल?"
19) "नाही. तसा कोणीच नाही."
20) "मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल?"
21) "नाही. असा कोणीच नाही."
22) "असे का?"
23) "कारण, समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे."
24) "त्याप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत 'तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे आणि नाही' किंवा 'आहे असे नाही आणि नाही असेही नाही' असे कोणतेही विधान लागू शकत नाही."
25) "तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत. आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत, थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहात नाही; किंवा राहते आणि राहात नाही, ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत."
26) "त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही."
27) खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेनदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला.
28) दुसऱ्या एका प्रसंगी पसेनदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले,
29) "भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय?"
30) "महाराज, यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही."
31) "भगवान, मग तथागतांना मृत्यूत्तर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय?"
32) "महाराज, मी तसेही म्हटलेले नाही."
33) नंतर त्याने खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले.
34) "भगवान, मी जेव्हा आपणाला विचारतो, मृत्यूत्तर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता, 'मी ते सांगितलेलेच नाही.' तर भगवान, ह्या न सांगण्याचे कारण काय?"
35) "राजा, मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे." त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच पसेनदीला प्रश्न विचारले.
36) "तथागत, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की, गुरुशिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत.
37) "भगवान, एका समयी मी भिक्खुणी खेमाकडे गेलो होतो. आणि तिला याच गोष्टीसंबंधी विचारले होते आणि भगवंतांसारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले."
38) "भगवान, आम्ही कामाची माणसे. आम्हाला पुष्कळ कामे आहेत. आम्ही निघायला हवे."
39) "महाराज, जा. आत्ता ज्या कामाची ही वेळ आहे व जे तुम्हाला उचित वाटत आहे ते करा."
40) या शब्दांनी आनंदित होऊन तथागतांना अभिवादन करून कोसल राजा पसेनदी आपल्या मार्गाला लागला.
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*कर्म*
१. बौद्ध आणि ब्राम्हणी कर्मसिद्धांत समान आहेत काय?*
*************************
No comments:
Post a Comment