पोस्ट नं 193

📚 पोस्ट नं 193 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
विभाग चार- धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत
Section IV
Dhamma to be Saddhamma must Pull Down all Social Barriers
🌷1. धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी धम्माने माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत (ii) 🌷
Dhamma to be Saddhamma must Break Down Barriers Between Man and Man
*************************

21) भगवान बुद्धांनी अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला.

22) "अश्वलायना, समज, एखाद्या क्षत्रियाने ब्राम्हण स्त्रीशी संग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी जन्माला येईल की, मनुष्य प्राणी?"

23) अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही.

24) "नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राम्हणाच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यांपासून दूर असलेली प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णियांच्याही ह्रदयांत ती उत्पन्न होईल?"

25) अश्वलायन म्हणाला, "चारही वर्णांच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात."

26) भगवान बुद्धांनी विचारले, "अश्वलायना, योन आणि कंबोज आणि त्यांच्या सन्निध असलेल्या देशांत, स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते, हे तू ऐकले आहेस काय?"

27) अश्वलायनाने उत्तर दिले, "होय, मी ऐकले आहे."

28) "तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाजरचना असेल, तर ती सर्व देशांत का आढळत नाही?"

29) या कोणत्याही मुद्दयावर अश्वलायनाला जाती आणि विषमता यांविषयीच्या आपल्या सिद्धान्ताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धांचे अनुयायित्व पत्करले.

30) वसिष्ठ नावाच्या एका ब्राम्हणाने बुद्धधर्म स्वीकारलेला होता. ब्राम्हण त्याच्या या धर्मान्तराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत.

31) एके दिवशी तो भगवान बुद्धांकडे गेला आणि ब्राम्हण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धांकडे कथन केले.

32) वसिष्ठ म्हणाला, "भगवान, ब्राम्हण म्हणतात की, ब्राम्हण हाच समाजातील सर्वात उच्च थरांतील असून इतर सर्व वर्ण नीच थरांतील आहेत. ब्राम्हण फक्त शुक्लवर्ण आहेत. इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राम्हण हे शुद्ध वंशातील आहेत. अब्राम्हण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राम्हणच ब्रम्ह्याचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मले आहेत. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे वारसपुत्र आहेत."

33) "आणि (ते मला म्हणतात:) तू तर आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंडया भिक्खूंच्या, त्या असंस्कृत श्रीमंतांच्या, त्या कृष्णवर्णाच्या, ब्रम्ह्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस, हे चांगले नाही. हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच, शिरमुंडया, कृष्णवर्णीय, गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकांत सामील झाला आहेस!"

34) "भगवान, या शब्दांनी ते ब्राम्हण मला दोष देतात; शेलक्या, बेछूट शिव्या मला घालतात."

35) यावर बुद्ध म्हणाले, "वसिष्ठा, खरोखर ब्राम्हण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राम्हणीही गर्भार राहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकांचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राम्हण मात्र आपण ब्रम्ह्याच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले, त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणवून घेतात. यामुळे ते ब्रम्ह्याची नालस्ती मात्र करतात."

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
१. धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी धम्माने माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत (iii)
*************************

No comments:

Post a Comment