

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
विभाग चार- धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत
Section IV
Dhamma to be Saddhamma must Pull Down all Social Barriers


Dhamma to be Saddhamma must Break Down Barriers Between Man and Man
*************************
1) आदर्श समाज कोणता? ब्राम्हणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे, आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे, वेदप्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे.
2) वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य.
3) वेदानुसार अशा समाजाने तीन अटी पाळल्या पाहिजेत.
4) पहिली अट म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात चार वर्ण असले पाहिजेत.
5) या वर्गांचे परस्परसंबंध क्रमिक विषमतेच्या तत्त्वावर आधारलेले असले पाहिजेत. म्हणजेच हे सर्व समान असता कामा नयेत. तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत:
6) ब्राम्हण हे सर्वांच्या वर. क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वर. वैश्य क्षत्रियांच्या खाली, परंतु शूद्रांच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली.
7) चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राम्हणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा, शूद्रांचा व्यवसाय वरील तीनही उच्च वर्णांची सेवा.
8) कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही.
9) ह्या आदर्श समाजाच्या सिद्धान्ताचा आग्रह धरून ब्राम्हणांनी तो लोकांना शिकवला.
10) या सिद्धान्ताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राम्हणी धर्माचा शास्त्रसम्मत सिद्धान्त आहे.
11) भगवान बुद्धांचा ह्या सिद्धान्ताला आमूलाग्र विरोध होता.
12) बुद्ध जातिसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून, समतेचा सर्वांत पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता.
13) जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही, की ज्याचे त्यांनी खंडन केले नाही.
14) या मुद्यावर भगवान बुद्धांना ब्राम्हणांनी पुष्कळच आव्हान दिले. परंतु बुद्धांनी त्या सर्वांना पूर्णपणे निरुत्तर केले.
15) अश्वलायन सूक्तांत एक कथा आली आहे. एकदा ब्राम्हणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन, त्याच्या जात आणि विषमता या मतांविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले.
16) अश्वलायन भगवान बुद्धांकडे गेला आणि त्याने ब्राम्हणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला.
17) तो म्हणाला, "हे गौतमा, ब्राम्हण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राम्हणांत वसत असते. अब्राम्हणांत ते वसत नाही. केवळ ब्राम्हणच ब्रम्ह्याचे औरसपुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मास आले. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतमा, तुझे काय म्हणणे आहे?"
18) भगवान बुद्धांच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला.
19) भगवान बुद्ध म्हणाले, "अश्वलायना, ब्राम्हणांच्या स्त्रिया ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असूनसुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊनसुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राम्हण खरे मानतात का?"
20) अश्वलायन निरुत्तर झाला.
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
१. धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी धम्माने माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत (ii)
*************************
No comments:
Post a Comment