पोस्ट नं 187

📚 पोस्ट नं 187 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
विभाग दोन- धम्म हा सद्धम्म होण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे
Section II
Dhamma to be Saddhamma must promote Pradnya
🌷3. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते 🌷
Dhamma is Saddhamma when it Teaches that what is Needed is Pradnya
************************

1) ब्राम्हण विद्या ही महत्वाची मानीत. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजनीय मानीत.

2) ते म्हणत की, राजाला स्वदेशी पुज्य मानतात. परंतु विद्या ही सर्वत्र पुजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की, विद्धान हा राजापेक्षा थोर आहे.

3) तथागतांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपण यांच्यातील भेद आहे.

4) असेही कोणी म्हणेल की, ब्राम्हणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत असत.

5) ते कदाचित खरेही असेल. परंतु तथागतांची प्रज्ञा आणि ब्राम्हणांची प्रज्ञा याता महदंतर आहे.

6) अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात तथागत बुद्धांनी हा भेद फार चांगल्या पद्धतीने स्पष्ट केला आहे.

7) एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनात खारींना जेथे धान्य देतात त्या मैदानात उतरले.

8) त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राम्हण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला:

9) "श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी चार गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात, तर हे चार गुण कोणते?"

10) "पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे म्हणजे कोणतेही वचन उच्चारताक्षणीच त्या वचनाचा अर्थ तात्काळ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्यांची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण असले पाहिजे आणि स्मरण करता आले पाहिजे."

11) "गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. काय करणे योग्य आहे, त्यासाठी काय व्यवस्था करायची, हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे."

12) "श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले कि आम्ही त्याला श्रेष्ठ समजतो. जर हे गुण प्रंशसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे गौतमांनी माझी प्रशंसा करावी. उलटपक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेन तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा."

13) "ब्राम्हणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करु शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही."

14) "तू सांगितलेस त्या पेक्षा अगदी वेगळे असे चार गुण माणसाच्या अंगी असले तर मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजनहितरत आणि बहुजनसुखरत असला पाहिजे. स्वभावतःच रम्य आणि स्वभावतःच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्यांने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनविलेले असले पाहिजे."

15) "ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे. आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे."

16) "जे संकल्प मनात उत्पन्न व्हावे असे तो म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे."

17) "त्याप्रमाणे उच्चत्तर विचारांशी (higher thought) निगडीत अशी जी चार ध्याने- ज्यात रममाण होणे ह्या जीवनातही सुखकर आहे, त्याला स्वछेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजेत."

18) "तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा (fetters) नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो याच जन्मी उपभोग घेतो."

19) "म्हणून हे ब्राम्हणा, नाही. तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करु शकत नाही; अथवा तुला दोष देऊ शकत नाही. परंतु मी सांगितलेले चार गुण ज्यांच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो."

20) "श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगले तू हे सांगितले आहेस."

21) "मी स्वतः गौतमाच्या अंगी हे चार गुण आहेत असे मानतो. तो बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी झटत असतो, तो त्यांना स्वभावतः सुंदर असणाऱ्या आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्यमार्गात आणून सोडतो."

22) "खरोखर गौतमा, हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करु शकतो."

23) "खरोखर, गौतम आपल्या इच्छेनुसार चार ध्याने करु शकतात. खरोखर तो आसवनाशाने आपले अंतःकरण विमुक्त करतो, ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो."

24) या ठिकाणी तथागत बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राम्हणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात विशद केला आहे.

25) या ठिकाणी तथागत बुद्ध प्रज्ञेला विद्येपेक्षा अधिक महत्वाची का मानतात हे त्यांनी स्प्ष्ट केले आहे.

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
विभाग तीन- धम्म हा सद्धम्म होण्यासाठी त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे
१. 'केवळ प्रज्ञा असणे पुरेसे नाही, तिच्यासोबत शीलही असणे अत्यंत आवश्यक आहे' असे जेव्हा धम्म शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते.

No comments:

Post a Comment