पोस्ट नं 183

📚 पोस्ट नं 183 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
विभाग एक- सद्धम्माची कार्ये
🌷2. जग हे धम्मराज्य बनविणे (ii) 🌷
To make the World a Kingdom of Righteousness
************************

23) धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला (instincts and dispositions) वळण लावणे, म्हणजे सुसंस्कृत करणे.

24) देवदह सूत्रात, जैन धर्माची चर्चा करताना तथागत बुद्धांनी हा उद्देश स्पष्ट केला आहे.

25) जैन धर्माचे संस्थापक असे मानीत असत की, सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे.

26) असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्मांचे, चुकांचे (misdeeds) विरेचन केले असता, आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहात नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते, आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो, आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते.

27) असा जैन धर्माचा दृष्टीकोन आहे.

28) यावर तथागतांनी असा प्रश्न केला: "तुम्हांला असे सांगता येईल का? -की, या इथे आता चुकीच्या वृत्तीचा (wrong dispositions) उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते?" (right dispositions acqired?)

29) याचे उत्तर 'नाही' असेच आले.

30) तेव्हा तथागतांनी विचारले, "जोपर्यंत तुम्ही अकुशल वृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तीचा अंगिकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही, तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे?"

31) तथागतांच्या मते, हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. *सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे.*
(A good disposition is the only permanent foundation of, and guarantee of, permanent goodness.)

32) म्हणूनच तथागत *बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे.*

33) धर्माचा जो दुसरा उद्देश तथागत आत्यंतिक महत्त्वाचा मानतात, तो म्हणजे *एखादे तत्त्व उचित म्हणून समजल्यावर, जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्त्वाच्या मार्गापासून विचलित न होणे.*

34) सल्लेखसुत्तामध्ये तथागत बुद्धांनी या मुद्यावर भर दिला आहे.

35) तेथे ते म्हणतात,

36) "जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही; अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मळ बनविले पाहिजे."

37) "जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये."

38) "जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये."

39) "दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे."

40) "दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये."

41) "जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये."

42) "जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये."

43) "जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी तुम्ही मात्र सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाणी, सम्यक् कर्म, सम्यक् आजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती आणि सम्यक् समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित नाही झाले पाहिजे."

44) "जरी दुसरे सत्य आणि निर्वाण (Deliverance) याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये."

45) "जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या आधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त असले पाहिजे."

46) "जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे."

47) "जरी दुसरे लोक शंकाकुल असेल तरी तुम्ही मात्र नि:शंक असले पाहिजे."

48). "जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, वाईट संगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सत्-असत् विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इ. दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणविले पाहिजे."

49) "दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिकटून असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे."

50) *"मी असे म्हणतो की, चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान (जाणीव) सुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद, माणसाने करावयाचे संकल्प, मी जे वर तपशिलाने सांगितले आहेत, ते करावयास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे.*"

51) तथागत बुद्धांच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे.

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
विभाग दोन- धम्म हा सद्धम्म होण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे
१. धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो
*************************

No comments:

Post a Comment