

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?


Belief in the infallibility of Books of Dhamma is Not Dhamma
( #कालामसुत्त )
************************
15) कालामाने विचारले, "मग आम्ही करावयाचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची?"
16) तथागताने उत्तर दिले, *"कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा.* ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय?"
17) कालामांनो, यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की, *"हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना?"*
18) "एवढेच पुरे नाही तर कालामांनो आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की, ते सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरी करण्याला प्रेरणा देणारे तर नाहीत ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे तर नाहीत ना? ते असंबद्ध भाषण करायला लावणारे तर नाहीत ना?"
19) "आणि शेवटी तुम्ही या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की, *'या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना?'*"
20) "आता कालामांनो, सांगा: ---
21) *"त्या श्रमण ब्राम्हणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत?"*
22) कालामांनी उत्तर दिले, *"भगवान, ते अहिताकडे नेणारे आहेत."*
23) "ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत?"
24) "भगवान, ते *हानिकारक* आहेत."
25) "ते निंद्य आहेत काय, कालामांनो?"
26) कालामाने उत्तर दिले, "भगवान, ते *निंद्य* आहेत."
27) "शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत?"
28) "शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात."
29) "त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते काय?'
30) "होय भगवान, त्यांचे पर्यवसान *कष्टात आणि दुःखात* होते."
31) "जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय?"
32) "नाही," कालामाने उत्तर दिले, *"भगवान, ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरत नाहीत."*
33) "आणि कालामांनो, मीही नेमके हेच म्हणतो आहे, *मीही हेच म्हणालो आहे. जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. केवळ वरवर पाहता जे विश्वसनीय वाटते म्हणून ते मानू नका. समजुती आणि दृष्टिकोण केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राम्हणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका."*
34) "जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की, ह्या गोष्टी अहितकर, दोषार्ह, सूज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे."
35) "भगवान! फार छान, फार छान! *आम्ही भगवंताला आणि त्याच्या धम्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान, आमचा स्वीकार करावा. आजपासून आमरण आम्ही तथागतांना शरण आलो आहोत."*
36) भगवान बुद्धाच्या ह्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. *'कोणाचीही शिकवण ती स्वीकारार्ह समजून मान्य करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की, ती धर्मग्रंथनिविष्ट आहे, त्यात तर्काची सूक्ष्मता आहे, किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे, म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टीकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्यस्वरुप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.'*
37) 'उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन *हितकर आहेत की निंदनीय* आहेत, *सदोष* आहेत की काय, ते *कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक* आहेत यांचा विचार करा.'
38) *या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश एखाद्याला मान्य करता येऊ शकतो.*


*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
१. मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म
*************************
No comments:
Post a Comment