

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?


Belief in the infallibility of Books of Dhamma is Not Dhamma
************************
1) वेद हे केवळ पवित्र आहेत, एवढेच नव्हे तर, ते स्वतः प्रमाण आहेत असे ब्राम्हण उदघोष करीत होते.
2) वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच नव्हे तर ते प्रमादातीत आहेत असे ब्राम्हण म्हणत.
3) *ब्राम्हणांच्या त्या मुद्याला बुद्धांचा विरोध होता.*
4) *वेद पवित्र आहेत, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत या तीनही गोष्टी तथागत बुद्धांनी नाकारल्या आहेत.*
5) त्यांच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्त्विक दर्शनाला ब्राम्हणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला; परंतु तथागत बुद्धांनी या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही.
6) *तेवीज्यसूत्तामध्ये* भगवान बुद्धांनी, *'वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पथ अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे.'* बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
7) वेद प्रमादातीत आहेत यासंबंधी त्यांचे म्हणणे असे की, *वेदच काय, कोणतेही वाङमय प्रमादातीत नाही.* प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे.
8). कालाम लोकांच्यापुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांनी हे मत स्पष्ट केले आहे.
9) एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत *कोसल जनपदातून* जात असता भगवान बुद्ध *कालामांच्या केसपुत्त* या नगरात आले.
10) जेव्हा कालामाला भगवान बुद्धांच्या आगमनाची वार्ता मिळाली, तेव्हा ते तथागताच्याजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कालामांनी तथागतांना उद्देशून म्हटले:
11) "भगवान! केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राम्हण, आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात. ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात. त्यांचे मत हीन मत आहे अशी त्यांची संभावना करतात. त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपापल्या धर्मसमजुतीचे प्रवचन करतात. त्यांचा महिमा गातात; परंतु त्याबरोबर ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडण आणि निर्भत्सना करतात."
12) "आणि म्हणून भगवान! *त्या श्रमण ब्राम्हणांपैकी कोणाचे सत्य मानावयाचे व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही.* त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे."
13) तथागतांनी उत्तर दिले, "तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे."
14) बुद्ध पुढे म्हणाले, "हे कालामांनो, *तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका.* जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. *जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.* जे केवळ *तर्कशास्त्रानुसार* आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ *न्यायशास्त्रानुसार* आहे म्हणून ते मानू नका. *जे केवळ सकृद्दर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.* ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. *जे केवळ बाह्यात्कारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यात्कारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.* एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका."
15) कालामांनी विचारले, "मग आम्ही करावयाचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची?"
16) तथागतांनी उत्तर दिले, *"कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा.* ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय?"
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
८. धर्मग्रंथ प्रमादातीत व अचूक आहेत असे मानणे म्हणजे धम्म नाही (ii)
*************************
No comments:
Post a Comment