

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?


Reading Books of Dhamma is Not Dhamma
************************
16) "भगिनींनो! माझी बुद्धी अल्प आहे. माझे शिक्षण अल्प आहे. मला फक्त एकच गाथा येते ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या."
17) तेव्हा भिक्खुणींनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला; परंतु आश्चर्य हे की, त्यांना तोंडसुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना खाली घातल्या.
18) पटिसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धांनी जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला.
19) त्या सर्व भिक्खुणी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्रचित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अर्हत झाल्या. (आणि त्यांना अर्हतपद प्राप्त झाले.)
20) दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले.
21) पटिसेनाची चर्या सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून तथागतांनी आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन ते त्याच्यामागून चालू लागले.
22) परंतु सर्व जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटिसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, "ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे."
23) तेव्हा पटिसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला.
24) हात धुतल्यावर नंतर भगवान बुद्ध मंचावर गेले आणि आश्चर्य हे की, भिक्षापात्र धरलेला पटिसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला.
25) तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, "अरे, हा कोण?"
26) तेव्हा तथागतांनी उत्तर दिले, "तो पटिसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधीस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्यामागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यास सांगितले आहे; परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही."
27) हे तथागतांचे शब्द ऐकल्यावर पटिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला.
28) तेव्हा प्रसेनजित तथागतांकडे वळून म्हणाला, "मी तर ऐकत होतो की पटिसेन हा एक अल्पबुद्धीचा, एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला?"
29) त्यावर तथागतांनी उत्तर दिले: *"विद्या अधिक नसली तरी चालते. कारण शील हीच प्रथम महत्त्वाची व सर्वोत्तम गोष्ट आहे."*
(Learning need not be much, conduct (Sila) is the first thing.)
30) "ह्या पटिसेनाच्या अगदी मनोरंध्रात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहेत. माणसाला ज्ञान असेल तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधःपातापासून वाचवू शकत नाही."
31) नंतर तथागत म्हणाले,
32) *"माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी त्याला त्यातील ओळींचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मुक्तीचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे."*
33) "माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? *धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले, तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे"*
34) तथागतांचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले दोनशे भिक्खू, राजा, मंत्रीगण हे आनंदित झालेे.
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
८. धर्मग्रंथ प्रमादातीत व अचूक आहेत असे मानणे म्हणजे धम्म नाही
*************************
No comments:
Post a Comment