

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?


Reading Books of Dhamma is Not Dhamma
************************
1) ब्राम्हण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ; विद्या हाच अंत. विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता.
2) उलटपक्षी भगवान बुद्ध, सर्वांना शिक्षण असावे या मताचे होते.
3) 'मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो' यालाच बुद्ध 'केवळ विद्येपेक्षा' अधिक महत्व देतात. आणि म्हणूनच बुद्धांनी सांगितले की, जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे; कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे.
4) विद्या आणि शील यांपैकी शीलाचे महत्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धांनी भिक्खू पटिसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते.
5) प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहात होते, त्या वेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही असा पटिसेन नावाचा म्हतारा भिक्खू होता.
6) म्हणून भगवान बुद्धांनी पाचशे अर्हतांना पटिसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली; परंतु तीन वर्षानंतरही पटिसेनाला एकही गाथा म्हणता येईना.
7) तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका पटिसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले. तथागतांना त्याची दया आली. त्यांनी पटिसेनाला आपल्याजवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्यांच्यापुढे पुढील गाथा म्हटली, *"जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो."*
8). तथागतांनी दाखविलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंत:करण प्रफुल्लित झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली.
9) तेव्हा भगवान बुद्धांनी पुन्हा त्यास उद्देशून म्हटले, "वृद्ध मनुष्या! आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा ते तुझा उपहास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक."
10) नंतर भगवान बुद्धांनी *तीन कायिक अकुशल कर्मे; चार मौखिक अकुशल कर्मे आणि तीन मानसिक अकुशल कर्मे, ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते* ती सांगितली. बुद्धांनी केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अर्हतपद प्राप्त झाले.
11) या सुमारास एका विहारात पाचशे भिक्खुणी राहात होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धांकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धांना एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली.
12) ही विनंती ऐकून तथागत बुद्धांनी त्या वृद्ध पटिसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले.
13) या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुणींच्या कानी येताच त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले.
14) नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुणी, पटिसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहून मिस्किलपणे हसत होत्या.
15) खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खूपुढे अन्न ठेविले. पटिसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुणींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेंव्हा तो वृद्ध भिक्खू धम्मपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला:
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
७. धम्मग्रंथांचे केवळ वाचन म्हणजे धम्म नाही (ii)
*************************
No comments:
Post a Comment