

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?


Belief in Soul is not Dhamma
************************
24) बुद्धांनी असाही प्रश्न विचारला की, "शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय?"
25) त्यांना अगणित उत्तरे अस्पष्ट स्वरूपात मिळाली.
26) "शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय?" यासंबंधी त्यांना आठ भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली.
27) "आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय?" यासंबंधीही त्यांना अगणित कल्पना आढळल्या.
28) तथागतांनी, "शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो?" हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय, यासंबंधी श्रमण ब्राम्हणांची मते भिन्न होती. काही म्हणाले की, "तो अतिशय दुःखी असतो." काही म्हणाले, "तो सुखी असतो." इतर काही म्हणाले की, "तो सुखी व दु:खी असतो;" व इतर म्हणाले, "तो सुखी अथवा दुःखीही नसतो."
29) आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील ह्या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुन्दाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते.
30) चुन्दाला तथागत म्हणाले, "हे चुन्द, जे श्रमण, ब्राम्हण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, 'मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय?' आणि ते उत्तर देतात, 'होय. माझेच मत खरे आहे. दुसरी मते मूर्खपणाची आहेत.' मी त्यांचे मत स्वीकारीत नाही. का? कारण, लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानीत नाही. एवढेच काय, ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानीत नाही."
31) आता एक महत्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की, "आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांची विचारसरणी काय होती?"
32) ईश्वराचे अस्तित्व नाकारताना भगवान बुद्धांनी जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे, तीच त्यांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे.
33) त्यांनी असा विचार मांडला आहे की, आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे.
34) ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्मादिठ्ठीला जितका बाधक आहे, तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे.
35) त्यांनी असे विवेचन केले आहे की, ईश्वरावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो, त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना, अंधश्रद्धेला कारणीभूत होतो. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भंयकर आहे. कारण त्यामुळे पुरोहितवर्ग निर्माण होतो. भ्रामक समजुतींचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो.
36) ह्या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तिवासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की, त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात, त्यांनी ह्या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे.
37) ही सर्व मते चूक आहेत. कारण त्यांनी महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की, आत्मा काही वस्तू नाही. म्हणूनच त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. (Anatta, i.e., non-soul)
38) आत्म्याच्याविरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धांनी त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे.
39) आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी आपला 'नामरूप सिद्धांत' मांडला.
40) हा नामरूप सिद्धांत 'विभज्ज-वादाच्याद्वारे' केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानवी व्यक्तीत्वाचा अथवा मानवाच्या अस्तित्वाविषयी घटकांच्या अतिशय सूक्ष्म, काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. (The theory is the result of the application of the Vibhaja test, of sharp, rigorous analysis, of the constituent elements of Sentient being, otherwise called Human Personality.)
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. आत्म्यावरील विश्वास हा धम्म नाही (iii)
*************************
No comments:
Post a Comment