

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
Part III- What is Dhamma?


To believe that Karma is the instrument of Moral Order is Dhamma
*************************
21) 'कम्म' (कर्म) म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य (man's action) आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम (effect). जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कम्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की, मनुष्य कुशल कम्म (सत्कर्म) करीत आहे.
22) भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत. ते ज्यांना कम्मनियम म्हणून ओळखतात त्या कम्माच्या नियमांचेही विवेचन करतात.
23) कम्मनियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की, ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणेच कर्मामागून त्याचा परिणाम येतो. हा एक नियम आहे (rule).
24) कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाराला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम टाळता येत नाही.
25) म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा: "असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कम्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कम्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी, त्रस्त होते."
26) हे शक्य आहे की, कम्म आणि कम्माचा होणारा परिणाम, या दोहोंमध्ये काही कालांतर असेल. असे बहुधा घडते.
27) या दृष्टीने कम्माचे तीन विभाग करता येतात: (1)दिट्ठधम्म वेदनीय कम्म (तात्काळ फल देणारे कम्म), (2)उपपज्जवेदनीय कम्म (ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कम्म), (3)अपरापरियवेदनीय कम्म (आनिश्चित काळाने फळ देणारे कम्म).
28) कम्म हे कधी कधी 'अहोसी' कम्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कम्मामध्ये ज्या कम्मांचा त्यांच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही, किंवा जी कम्मे अन्य सबळ कम्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो.
29) या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धाच्या 'कम्माचा नियम अनिवार्य आहे' या सिद्धांताला बाधा येत नाही.
30) कम्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही, एवढेच काही कम्मसिद्धांतात अभिप्रेत नाही. एवढाच त्यात आभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधी कधी एकाच्या कम्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो; तथापि हे सर्व कम्म नियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कम्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो.
31) व्यक्ती येतात, जातात; पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कम्मनियमही अप्रतिहत राहतो.
32) याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मांत ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे.
33) यास्तव "विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते?" याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे.
34) असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजावून घेतला जातो. प्रायः, जवळ जवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, चुकीचा सांगितला जातो, अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. "नैतिक व्यवस्था कशी राखली जाते?" या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धाने कर्मसिद्धांत मांडला; या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते.
35) तथापि कम्मसिद्धांत मांडण्यात बुद्धांचा हाच हेतू होता.
36) कम्मनियमाचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही.
37) त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे.
38) ह्या कारणास्तव "कम्मनियम" हे धम्माचे एक अंग आहे.





*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग चवथा - धम्म म्हणजे काय नाही
१. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे धम्म नाही
*************************
No comments:
Post a Comment