

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
Part III- What is Dhamma?


To believe that Karma is the instrument of Moral Order is Dhamma
**************************
1) ह्या भौतिक जगात एक प्रकारची सुव्यवस्था (an order) आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते.
2) आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात–गतीत–एक प्रकारची सुव्यवस्था आहे.
3) ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे. नियमित क्रमाने ऋतू येतात आणि जातात.
4) *काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बीजांचे वृक्ष होतात. वृक्षांपासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत 'बीज' निर्माण होते.*
5) बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला *नियम* म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित क्रम दर्शविणाऱ्या नियमांना *ऋतुनियम, बीजनियम* असे संबोधितात.
6) समाजामध्येही याच प्रकारचा *नैतिक क्रम* आहे. तो कसा उत्पन्न होतो? कसा राखला जातो?
7) जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे.
8). ते म्हणतात, *"विश्वाचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने विश्व निर्माण केले आहे आणि 'ईश्वर' हाच या विश्वाचा कर्ता, धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे."*
9) त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात; कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. *आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे. आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो.*
10) जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांचे विचार वरील प्रमाणे असतात.
11) *ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही.* कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर *ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते?*
12) ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार (authority) आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहेत. *परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही.*
13) ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे.
14) असे म्हटले जाते की, 'परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की, ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की, त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती, शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे.'
15) 'परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत; त्या नियमांनुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे.'
16) 'म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा (प्रकृतीचा) आहे, ईश्वराचा नाही.'
17) सिद्धांतात वरीलप्रमाणे असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही. *या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी (नैतिक व्यवस्थेची) फक्त पड़त नाही. परंतु प्रश्न उरतोच की, ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर (प्रकृतीवर) का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय?
18) सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे.
19) *तथागतांचे उत्तर सोपे आहे.* ते असे, *"नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कम्म (कर्म) नियमाप्रमाणे सांभाळली जाते."*
20) *सृष्टीची नैतिक व्यवस्था* (moral order of the universe) चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु तथागतांच्या मते ती *माणसावर सोपविलेली आहे.* इतर कोणावर नाही.





*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
६. 'कर्म' हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म (ii)
*************************
No comments:
Post a Comment