पोस्ट नं 156

📚 पोस्ट नं 156 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
Part III- What is Dhamma?
🌷3. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे (ii) 🌷
To Live in Nibbana is Dhamma
**************************

16) गयेत राहात असताना बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय *राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत* हा आहे. बुद्धांनी सांगितले:

17) "भिक्खू, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत?"

18) "भिक्खूंनो! चक्षुरिंद्रिय, डोळे हे पेटलेले आहे. दृश्य, विविध रुपे हे पेटलेले आहेत. डोळ्यांनी होणारी जाणीव (चक्षुसंस्कार) ही पेटलेली आहे. चक्षुसंस्कारापासून उद्भवणा-या सुखकारक, दुःखकारक, अदु:खकारक गोष्टी ह्याही जळत आहेत."

19) "आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत?"

20) "त्या रागाग्नीने, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दु:ख, दौर्मनस्य त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत."

21) "भिक्खूंनो! कान जळत आहे. शब्द जळत आहे. घ्राणेंद्रिय जळत आहे. गंध जळत आहे. जिव्हा जळत आहे. रस जळत आहे. शरीर जळत आहे. चित्तातील संकल्प-विकल्प जळत आहेत. चित्तसंस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःखवेदना उत्पन्न होतात, त्या सर्व वेदना जळत आहेत."

22) "आणि ह्या कशामुळे जळत आहेत?"

23) "त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख आणि निराशा यांच्यामुळे जळत आहेत."

24) "हे जाणल्यावर, भिक्षूंनो! प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा (विरक्ती) उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी, लोभ, आदि विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते."

25) निब्बाणामुळे सुख कसे मिळते? या दुस-या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे.

26) एक सर्वसामान्य समजूत आहे की, माणसाला पुरेसे मिळाले नाही की, तो दुःखी होतो. परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो.

27) हा लोभाचा परिणाम आहे, आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे.

28) हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे.

29) "लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात."

30) "परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवीत नाही."

31) "आणि असे झाले की, बंधूंनो! ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाण भविष्य-जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते."

🌸☘🌸☘🌸
*************************
For English: see the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
खंड तिसरा:
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
३. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे (iii)
*************************

No comments:

Post a Comment