

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग आठवा- पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा
Conversion of the Fallen and the Criminals


Conversion of Angulimala, the Robber
*************************
22) त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थविर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला, "आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय?"
"होय, महाराज!"
23) "महाशय, आपल्या पित्याचे कूळ कोणते होते (family)? आणि आपल्या मातेचे कोणते?"
"माझ्या पित्याचे कूळ गार्ग्य (Gagga) होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी (मैत्रायणी, Mantani) होते."
24) "गार्ग्य, मैत्रायणीपुत्रा, सुखी हो. आपल्या सर्व गरजा पुरविण्याची मी काळजी घेईन."
25) परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची व टाकून दिलेल्या वस्त्रांची तीनपेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले.
26) नंतर राजा भगवंतांच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, "आश्चर्य आहे भगवंत, खरोखर हे आश्चर्य आहे. अमानुषाला माणसाळविण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंतांची केवढी ही किमया! हा असा पुरुष आहे, ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही; परंतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकले! भगवंत, मला आता गेलेच पाहिजे. कारण बरीच कामे मला अद्याप उरकावयाची आहेत."
27) "राजन्, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या." नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने तथागतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला.
28) एके दिवशी चीवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला; तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले. त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली. आणि तशा स्थितीत तो भगवंतांच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले, "हे सगळे सहन कर. हे सगळे सहन कर."
29) याप्रमाणे भगवान बुद्धांची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक सत्पुरुष (righteous man) बनला.
30) मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, "ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती, तो आता आस्था दाखवू लागतो; आपले पूर्वजीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धांना शरण जातो तो चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो."
31) "माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाचे अवलंबन करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा."
32) "स्वतःला 'अंगुलीमाल' म्हणवून व प्रवाहपतित होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला, जमिनीवर आणले. 'अंगुलीमाल' म्हणून मी रक्ताने माखलेला होतो; आता माझा उद्धार झाला आहे."
*********************
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
३. इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा
*********************
No comments:
Post a Comment