📚 पोस्ट नं 14 📖
*"बुध्द आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 8. विवाह 🌷
( Marriage )
*********************
1) दंडपाणि नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी (sila) प्रसिद्ध होती.
2) यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणि तिच्या लग्नाचा विचार करत होता.
3) त्या वेळच्या प्रथेनुसार दंडपाणि यांनी आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली.
4) सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते.
5) सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती.
6) त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला.
7) जमलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली.
8 ) दंडपाणि विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वितेबद्दल तो साशंक होता.
9) त्याला वाटायचे सिद्धार्थाला साधुमुनींच्या सहवासाने वेड लागले आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल.
10) सिद्धार्थाखेरीज दुसऱ्यासोबत विवाह करणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, "साधुंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा अपराध आहे काय?" यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते.
11) सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास मान्यता देण्यास दंडपाणिला सांगितले. दंडपाणिने तशी संमती दिली.
12) गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले.
13) त्यांना वाटले की, त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती. पण तिने तसे काही केले नाही.
14) त्या वेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले की दंडपाणि यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करु देणार नाही. आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल.
15) परंतु दंडपाणि या बाबतीत अयशस्वी झाला. तेव्हा त्यांनी धीर करुन अशी मागणी केली कि धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणिला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले.
16) सुरुवातीला सिद्धार्थ यासाठी तयार नव्हता. तेव्हा, त्यांने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कूळ व सर्वात अधिक यशोधरा यांना खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनास आणून दिले.
17) त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले.
18) स्पर्धा सुरु झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले.
19) गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली. परंतु त्याची बिनचूक निशाणेबाजी सर्वश्रेष्ठ ठरली.
20) तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन व दंडपाणि या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही आनंद झाला.
21) विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव "राहुल" असे ठेवण्यात आले.
☘🌿🌸🌷🌸🌿☘
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुध्द आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: ९. पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना
*********************
No comments:
Post a Comment